Wednesday, March 4, 2020

Trimbakeshwar unveiled through Inscriptions




शिलालेखात दडलेले त्र्यंबकेश्वर
दगडावर कोरलेले शिलालेख मोलाचा ऐतिहासिक वारसा. उन-वारा पावसाच्या माऱ्यात पुसट झालेले लेख वाचता नाही आले तर मोठी डोकेदुखी ठरते. त्र्यंबकेश्वर मंदिरातील दोन मोठे शिलालेख जीर्ण अवस्थेत असल्यामुळे त्यांचे वाचन हे एक कोडे बनले होते. त्र्यंबकेश्वरचे इतिहास अभ्यासक राजेश दीक्षित यांनी या लेखांचे वाचन शोधून काढले असून दोन्ही लेखांचे मराठीत भाषांतर करून दिल्याने एक महत्वाचा दस्तावेज अभ्यासकांसाठी उपलब्ध झाला आहे.
निमित्त घडले ते एका शिलालेखाचे. त्यातून त्र्यंबकेश्वर नगरीचा एक मोठा कालपट नजरेसमोर उभा राहिला. जणू काही हजार वर्षांचा वेगवान स्मृतिचित्रमय आढावा. त्र्यंबक...साडे तीन अक्षरांचे हे नाव आपल्या समोर किती वेगवेगळ्या रूपात समोर येते. मध्ययूगापासून ह्या प्रदेशाच्या राजसत्तेचे ते प्रमुख केंद्र होते. गंगावतरणाच्या निमीत्ताने पुराणकाळात येथे मोठी हलचल झाली. खुद्द शिवशंकराला येथे पर्वत रूपात यावे लागले व पर्वत बनून कायमचे रहावे लागले. स्वर्गीची गोदावरी येथे आणावी लागली. जोडीला ब्रम्हा आणि विष्णूंनी शिवाची साथ संगत केली. भारतीय तत्वज्ञानातील तीनही प्रमुख देवतांचे अस्तित्व. प्रत्येक काळात प्रमुख राजे, सरदार, विद्वान मंडळींनी येथे दिलेल्या भेटी. दक्षिण भारतातील एकमात्र सिंहस्थ कुंभमेळा अशा विविध कारणांमुळे या नगरीची ख्याती जगभर पसरली. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे हे मोठे जागृत स्थान असल्याची मान्यता. मोठी संकटे आली की, राजसत्तेची धाव त्र्यंबकेश्वरी. गणित, न्याय, सांख्य दर्शन, नाथ, महानूभाव, वारकरी अशा कित्येक परंपराचे उद्‌गार या भूमित सर्वप्रथम उठले. इतकेच काय मनोरंजन जग व्यापणाऱ्या भारतीय चित्रपट सृष्टीचा उगम येथेच झाला. ह्या पटाची आठवण झाली ती त्र्यंबकेश्वर मंदिरात अज्ञाताच्या गर्तेत दडलेल्या दोन शिलालेखांचे वाचन उपलब्ध झाल्याने.  ३/३/२०२० तो हा दिवस. हे शिलालेख कित्येक वर्ष दुर्बोध बनले होते ते त्यांची अक्षरे पुसट जीर्ण झाल्यामुळे. या अक्षरांच्या आड नेमके दडलेय तरी काय? असा प्रश्न या शिलालेखांकडे बघून भेडसावत होता. त्यात काही काळापासून हे शिलालेख असलेली मंदिरे पुरातत्व खात्याने कुलूपबंद करून ठेवल्याने त्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले होते.

 त्र्यंबकेश्वर नगरीचा जुना इतिहास उलगडतो तो वेगवेगळ्या कालखंडात लिहीलेल्या धार्मिक, तत्वज्ञान आदी ग्रंथातून, पोथ्या पुराणातून, ऐतिहासिक दस्तावेजातून, काही प्रमाणात जुन्या नाण्यांच्या माध्यमातून. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसलेंच्या पासूनची इतिहासाची असंख्य पाने, ‘त्र्यंबकेश्वरी काय घडले याची माहिती देतात’छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची त्र्यंबकेश्वरावर नितांत श्रद्धा होती. त्यांनी येथे महत्वाच्या प्रसंगी अनुष्ठाने केल्याचे, न्याय निवाडे केल्याचे दाखले जुन्या पत्रातून आणि त्यांनी जारी केलेल्या आदेशपत्रातून बघायला मिळतात. 
रघुनाथरावांनी बांधलेली शिवमंदिरे

जुनी नाणी आणि त्या जोडीला शिलालेखांचेही महत्व आहे. आज घडीला त्र्यंबकेश्वरात सात जुने शिलालेख उपलब्ध आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर संगमरवरी दगडात पेशव्यांनी बांधलेल्या मेरू प्रासादाचा लेख कोरला आहे. मंदिराच्या आतील बाजुस दक्षिण तटभिंतीलगतच्या ३० शिवालयांपैकी पहिल्या व शेवटच्या अशा दोन शिवालयात अदमासे २ फुट रूंद, ३ फुट उंचीचे दोन लेख कारले आहेत. ह्या लेखाची अक्षरे अजिबात वाचता येत नाहीत. थोडी थोडी अक्षरे वाचता येतात, पण सलग एक ओळ वाचणेही अशक्य. मध्यंतरी त्र्यंबकेश्वर संस्थानाने काही अभ्यासकांना पाचरण करून लेखांचे वाचन करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतू अक्षरे कळत नसल्याने वाचन होत नव्हते. धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर अलिकडे दोन उपयूक्त पुस्तके लिहीणारे त्र्यंबकेश्वरचे राजेश दीक्षित यांना आगामी लेखन कार्यासाठी माहिती जमवताना या शिलालेखांची माहिती असलेल्या शंभरवर्षापूर्वीच्या पुस्तकाचा सुगावा लागला. नोव्हेंबर २०१२मध्ये न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी स्मरणयात्रा ही जुन्या दुर्मिळ पुस्तकांची माहिती देणारी लेखमाला लिहीली होती. त्यात ‘तीर्थयात्रा प्रबंध’, ह्या गणेश लेले यांनी लिहीलेल्या ग्रंथावरील परिक्षणात त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिलालेखाची माहिती असल्याचे लिहीले होते. स्वत:चा उत्तम संग्रह असलेल्या राजेश दीक्षित यांनी आपल्या लेखनकार्यासाठी लागणारे दुर्मिळ ग्रंथ मिळविण्यासाठी विविध ग्रंथालये पालथी घातली. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात त्यांना तीर्थयात्रा प्रबंधाची प्रत बघायला मिळाली. त्याची नक्कल मागवून घेतली तरी ती वाचनाचा योग येत नव्हता.
पेशवाईतील शिल्पकलेचा सुंदर अविष्कार श्री त्र्यंबकेश्वर मंदिर...

मंदिरातील दोन्ही शिलालेख पुसट झाल्याने त्याचे वाचन अवघड झाले असून ते करणे गरजेचे आहे’,  अशी निकड संस्थानचे विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वराचे माध्यान्य पुजक सत्यप्रिय शुक्ल यांनी व्यक्त केली होती. ‘मंदिरातील दोन्ही शिलालेख पुसट झाल्याने त्याचे वाचन अवघड झाले असून ते करणे गरजेचे आहे’,  अशी निकड संस्थानचे विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वराचे माध्यान्य पुजक सत्यप्रिय शुक्ल यांनी व्यक्त केली होतीहे निमीत्त घडले आणि विशवस्त दिलीप तुंगार त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या शिलालेखाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही शिलालेखांची छायाचित्र त्यांनी उपलब्ध करून दिली. सद्या दक्षिण कोटाच्या लगत असलेली ३० शिवमंदिरे दरवाजा लाऊन बंद करण्यात आली आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर दुध, जल, फळे हळदी कुंकी चढविण्यात येत असल्याने सर्व शिवालयातील शिवलिंगाची मोठी झीज झाली आहे. हल्ली हे पदार्थ भेसळयूक्त मिळत असल्याने दगडाची वाजवीपेक्षा अधिक वेगाने झिज होते. त्यातच आतील दोन्ही शिलालेख वाचण्याच्या पलिकडे इतके पुसट झाले आहेत.

मंदिराची ध्वजा, कळस आणि शिखराचे सुंदर कातळ कोरिव काम

तीर्थयात्रा प्रबंध
त्र्यंबकेश्वरमध्ये १८२५ मध्ये जन्मलेले गणेश सदाशिवशास्त्री लेले यांनी पेशवा काळातील प्रसिद्ध सरदार घराण्यातील रघुनाथराव विंचूरकर यांनी भारतभर केलेल्या तीर्थयात्रांवर हा ग्रंथ लिहीला आहे. त्यांनी कालिदासाच्या रघुवंशमचे भाषांतर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, गंगाचरित्र काव्यात लिहीले आहे. आपल्या मराठी भाषेत प्रवासवर्णनावरची पुस्तके कमी आहेत. त्यातही शंभर दिडशे वर्षांपूर्वीच्या कालखंडातली पुस्तके फारशी नाहीत. गोडसे भटाचा १८५७ चा प्रवासवर्णन ग्रंथ आहे, पण तो शुद्ध प्रवासवर्णन ग्रंथ नाही. इंग्रज अंमलच्या आरंभीच्या काळात होऊन गेलेले तंजावरचे राजे सर्फोजी यांनी भारतात बऱ्याच ठिकाणी प्रवास केला, त्याची वर्णने उपलब्ध आहे. 
वयाच्या अकराव्या वर्षी सरदार विंचूरकर घराण्यांचा कारभार सांभाळणारे रघुनाथराव उर्फ अण्णासाहेबांनी वयाच्या २४व्या वर्षी प्रापंचिक सुखाचा त्याग करून हिमालया पासून कन्याकुमारी अशा विविध भागात तिर्थयात्रा केल्या. एक मोठा लवाजमा सोबत घेऊन त्यांनी या यात्रा केल्या. अनेक ठिकाणी दानधर्म केले. शके १७८२ मध्ये रघुनाथराव सात महिने त्रिंबक मुक्कामी राहिले. त्रिंबकेश्वर महादेवावर त्यांनी संतत सात महिने जलधारा भिषेक अनुष्ठान चालविले. ब्रम्हगिरीच्या दोन प्रदक्षिणा केल्यानंतर शके १७८३ साली वद्य ९ रोजी त्र्यंबकेश्वराच्या देवालयावर कळस नसल्याने त्यांनी तांब्याचे सोन्याचा मुलामा असलेले कळस स्थापन केले.
देवळाच्या शिखरावर एक मोठा, सभामंडपावर मध्यम आकाराचा, बाजूस लहान तीन व नंदीच्या देवळावर एक असे एकुण सहा कळस बसविले. शके १७८७ साली कार्तिक शुद्ध पौर्णिमेस लाकडाचा रथ श्री त्र्यंबकेश्वरास अर्पण करून प्रतिवर्षी रथाचा उत्सव होण्याकरिता विंचूर येथील जमिन आकार रूपये ६१८ चे दानपत्र करून दिले. शके १७८८ साली त्यांनी कुशावर्ताच्या चार बाजूस चार, .... केदारेश्वर देवळावर दोन, त्रिभूवनेश्वर देवळावर दोन, ज्वरेश्वर देवळावर एक असे असे एकुण दहा सोन्याच्या मुलाम्याचे कळस बसविले. पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर देवालय गळत असे त्यास चुन्याची टिपगारी करविली. शके १७९४ साली त्यांनी कार्तिक शुद्ध द्वितीयेला त्र्यंबकेश्वर देवळावर चांदी व सोन्याचा मुलामा असलेली ध्वजा बसविली. शके १७७५ साली देवालय ते कुशावर्त हा गोदावरी नदीच्या दुतर्फा रस्ता रूंद करवून चालण्यास व रथ नेण्यास प्रशस्त करून घेतला. शके १७९६ साली इंग्रजांनी गोदावरी नदीवर पुल बांधला त्याचा खर्च रघुनाथरावांनी केला. संत निवृत्तीनाथ समाधिस पुजा व नैवैध्य नित्य होत नसे, त्यासाठी त्यांनी नेमणूक करून दिली जी अद्याप पर्यंत चालू आहे. शके १८०० साली रघुनाथरावांनी त्र्यंबक देवालयात लहान लहान अशी ३० देवालये बांधून त्यात शिवलिंगांची स्थापना केली. यातील पहिल्या देवालयास त्यांनी जगदगुरू शंकराचार्यांचे नाव दिले तर दुसऱ्या देवालयास कुलयजमान बाजीराव पेशवा यांचे नाव दिले. अन्य देवालयांना आपल्या कुळातील व पितरातील व्यक्तींची नावे दिली. शेवटचे दोन देवालये पिशाच्चमोचनेश्वर व सर्व पापहरेश्वर अशी नावे दिली. राजेश दीक्षित यांनी या दोन्ही शिलालेखांचे वाचन तिर्थयात्रा प्रबंधावरून घेतले. हा एकच लेख दोन भागात कोरण्यात आला आहे. हे लेख संस्कृत भाषेत असून त्यांचे त्यांनी मराठीत स्वैर भाषांतर करून दिले. त्र्यंबकेश्वराचे केवढे मोठे महत्व होते हे इतिहासात झालेल्या संघर्षावरून आपल्याला कळते.
नंदीमंडपावरील कळस

बाळाजी बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत सुरू झालेले बांधकाम सतत ३१ वर्षे चालले व त्यावर त्या काळात दहा लक्ष रूपये असा अफाट खर्च करण्यात आला. विंचूरकरादी मोठे प्रस्थ मंदिराच्या बांधकामावर लक्ष ठेवून होते. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वराचे महत्व ओळखून येथे अनुष्ठाने केली, इथल्या लोकांना अभयपत्र दिले. स्वराज्याची राजधानी उभारताना रायगडावर शिवाजी महाराजांनी खास कुशावर्त तलावाची निर्मीती केली. राजधानीतही कुशावर्तासारखे पवित्र तिर्थ असावे अशी त्यामागची भावना तर नसेल? कदाचित महाराजांना गर्दीत येऊन त्र्यंबकेश्वरी कुंभ पर्वकाळात स्नान करणे शक्य नसेल तेव्हा त्यांनी रायगडाच्या कुशावर्ततच कुंभस्नान तर केले नसेल?
शिलालेख, ताम्रपट, जुने दस्तावेज, नाणी यातून सापडणारा हा अस्सल इतिहास आपला मोलाचा वारसा आहे. तो जोपासण्यासाठी पूर्वी राजाश्रय होता. आता इतिहसाची ही पाने जिर्ण होत आहेत. याकरिता शासनाच्या, विध्यापिठांच्या आश्रयाशिवाय तो जोपासणे शक्य होणार नाही. त्र्यंबकेश्वरचे पुरातन काळापासूनचे धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्व पाहता येथे अध्ययन व संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे या परिसरातील दुर्मिळ ग्रंथसंपदा जतन करण्यासाठी मोठे सुसज्ज ग्रंथालय निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्रिंबकगडाचे अनेक अवशेष विखुरलेल्या स्थितीत आहेत. त्यावर उत्खनन, संशोधन करण्याची आवश्यकता आहे. ते करण्यात जितकी दिरंगाई होईल तितका त्यांचा नाश होण्याची शक्यता वाढेल. पूर्वी त्र्यंबकनगरीत जुने नक्षिकाम केलेले, घडवलेले दगड रस्त्याच्या कडेला विखुरलेले दिसायचे. मधल्या काळात बरीच बांधकामे झाली. रस्त्यांची कामे झाली त्यात हे दगड कुठे गेले याचा थांगपत्ता लावायला हवा. मुसलमानपूर्व काळात त्र्यंबकगडावर हिंदू राजवटीत फार मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली. त्याचा इतिहास गडाच्या ढिगाऱ्याखाली दबला आहे. 
महादरवाजा मोठ्या दरडीखाली चिनून गेला आहे. ते ढिगारे गेल्या पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळापासून थरावर थर साठत आहेत. महादरवाजाचे बांधकाम कोणत्या शैलीतले. कोणत्या कालखंडातले. त्यावर कोणती शिल्पे, हे ढिकारा उपसला जात नाही तोवर यावर काहीच प्रकाश टाकला जाऊ शकत नाही. दिवसेंदिवस कातळातला हा अनमोल इतिहास नष्ट होण्याच्या वाटेवर चाललेला आहे. दुर्गभांडारचा पायरी मार्ग, आज घडीला सर्वाधिक वापर असलेला गडाचा उत्तर बाजुचा पायरी मार्ग ही सगळी कामे हिंदू राजवटीतली, आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणारी. इतिहासाचे अभ्यासक महेश तेंडुलकर यांनी ब्रम्हगिरी आणि देवगिरी या दोन्ही किल्ल्यांचे बांधकाम एकाच काळात म्हणजेच यादवांच्या काळात झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. ‘दरडीखाली दबलेल्या महादरवाजावरची काही शिल्पे सातवाहन काळाकडे निर्देश करतात’, अशी अभ्यासकांची निरीक्षणे आहेत.  जुन्या लेखातून या संबंधी शाश्वत माहितीचा उलगडा होऊ शकतो, परंतू आपल्याकडे जुन्या माहितीचा अभ्यास व त्यावरील संशोधन हे कुर्मगती असून काळाच्या ओघात तर बरीच साधने नष्ट होत आहेत. पुण्याच्या पेशवा दफ्तरात म्हणे मराठ्यांच्या विविध कालखंडातील अस्सल कागदपत्रांच्या जंत्र्या अभ्यासकांच्या अभावी म्हणे पडून आहेत. याकरिता मोडी जाणणाऱ्या व इतिहासाची आवड असणाऱ्या अभ्यासकांची आवश्यकता असल्याचे आवाहन मध्यंतरी समाजमाध्यमातून करण्यात आले होते.
त्र्यंबकेश्वर मंदिरावरचे शिलालेख हे पेशवा/इंग्रज कालखंडातील आहेत. निलपर्वतावरील निलांबिका मंदिरावर दोन जुने शिलालेख दष्टीस पडतात, परंतू जुन्या आखाड्याच्या आख्यारित असलेल्या या मंदिराला संपुर्ण ऑईलपेंटने रंगविल्याने हे लेख वाचता येत नाहीत. उदाशांच्या आखाड्यात एक लेख आहे. 
भातखळ्याच्या बारवेजवळ अनेक वर्षे पडून असलेल्या जुन्या शिलालेखाचा भाग. 
सद्या त्याचा मागमूस नसून त्याचे वाचनही उपलब्ध नाही.

कुठे गेला भातखळ्याचा लेख? 
ब्रम्हगिरीवर भातखळे म्हणून प्रसिद्ध असलेल्या व मुलतानच्या सिंध व्यापाऱ्याने बांधलेल्या धर्मशाळेच्या मागिल बाजूस एक जूनी बारव आहे. त्या परिसरास मेटघर किल्ला असे वनखात्याचे फलक लागलेले दिसतात. वस्तविक किल्ला हा ब्रम्हगिरीच आहे. आणि त्याच्या परिसरात गंगाद्वाराची मेट, विनायक मेट, हत्तीदरवाजाची किंवा महादरवाजाची मेट, सुपल्याची मेट अशा मेटा म्हणजेच गडाच्या परिघातल्या वस्त्या व युद्ध प्रसंगीच्या लढाऊ फळ्या आहेत. ही बारव पुर्णपणे ढासळलेली होती. तिच्या बाजूला एक जुन्या शिलालेखाचा तुकडा बरीच वर्षे पडलेला होता. त्याचा दुसरा भाग सापडलेला नाही. यंदाच्या सिंहस्थ पर्वाच्या दरम्यान या बारवेचे ढासळलेले चिरे गोळा करून तिची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यावर किंवा तिच्या आसपास हा उरला सुरला तुकडाही आता दिसत नाही. सुदैवाने त्याचे छायाचित्र उपलब्ध आहे.
त्र्यंबकेश्वर इतिहास मंडळात त्र्यंबकेश्वर येथे सापडलेल्या नाण्यांच्या माहितीचे सादरीकरण

नाण्यांचे घबाड
त्र्यंबकेश्वर हे मोठे राजकीय केंद्र होते हे इथे सापडणाऱ्या नाण्यांवरूनही स्पष्ट होते. १९४० साली नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाढोली येथे एका शेतात दिल्लीच्या तिन विविध सुल्तानांची ३८७७  इतकी आवाढव्य संख्येने नाणी सापडली. हे घबाड सापडले त्याची माहिती सी. आर. सिंघल यांनी जेएनएसआय १९४२ च्या चौथ्या खंडात प्रकाशित केली आहे. अर्थात हे घबाड इंग्रज आमदनीत सापडल्याने ते इंग्रजांनी त्यांच्या तिजारीत किंवा संग्रहालयात जमा केले असावे. त्याच ठिकाणी
नाण्यांवर संशोधन करणारे हे महत्वपूर्ण संशोधन केंद्र वाढोली येथे असून विविध ठिकाणच्या नाण्यांचा संग्रह येथे करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे केंद्र त्याच ठिकाणी उभारले आहे जिथे ही नाणी सापडली. 
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची भरपाई करताना सुरतेची लुट करण्यापूर्वी त्र्यंबकेश्वरी अनुष्ठान केल्याची वदंता आहे. शिवापूर दप्तराचा उल्लेख करून महेश तेंडुलकर यांनी सुरतेच्या स्वारीवरून परतल्यानंतर महाराजांनी त्र्यंबकेश्वरी वास्तव्य करून अनुष्ठान केल्यांची नोंद, त्र्यंबकगड-अंजनेरी-रामसेज यापुस्तिकेत केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या दोन शिलालेखांवर नव्याने प्रकाश पडल्याने या परिसराच्या इतिहास संशोधनाला चालना मिळण्याची आवश्यकता आहे.
संस्कृत शिलालेखाचा अनुवाद करणारे इतिहासाचे अभ्यासक राजेश दीक्षित





त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिलालेखांचा राजेश दीक्षित यांनी केलेला स्वैर अनुवाद:

मौन ऋषींनावाचे उत्तम गोत्र असलेले रघूनाथ नावाचे कुलीन राजे।। दानी उप नावाने ओळखले जाणारे दैवतरूपी गंगा आणि विठ्ठल (माता व पिता) यांच्या पासून उत्पन्न झालेले ।। १।।
त्र्यंबक क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर देवालयावर सुवर्णमय।। कुशावर्ताच्या द्वार व कळसावर निर्माण केले ।। २ ।।
कळस व छत्र स्थापन केले वृषसांड (वृषोत्सर्ग विधी) समर्पित केले ।। शंकराच्या मंदिरावर चांदीची ध्वजा समर्पित केली ।। ३ ।।
वार्षिकोत्सव (त्रिपूरारी उत्सव) यात्रेसाठी घंटाध्वजांनी यूक्त असा ।। लाकडी रथ विधिवत दान केल्याची घोषणा केली ।। ४।।  
स्वत:ची पत्नी, मुलगा, आई अशा परिवार समवेत ।। वर्तमान समयी (या घडीस) स्वत:च्या पितरांच्या मुक्तीसाठी ।। ५।।
श्रीगुरू शंकराचार्य यांच्यासाठी पहिले लिंग (मंदिर) असून दुसरे।। स्वत:च्या वंशाचे स्वामी (यजमान) असलेल्या श्री बाजीराव (पेशवे) यांच्या नावे ।। ६।।
स्वत:च्या सर्व पुर्वजांचे पाप हरण करण्यासाठी ।। क्रमाने त्यांची नावे वृषभध्वजावर ।। ७ ।।
त्या शिवलिंग मंदिरांसोबत त्यांची नावे तो राजा लिहीता झाला ।। सर्वांना आकलन होण्याकरिता क्रमाने ।।
जगतगुरू शंकराचार्य, पालनकर्ता बाजीराव ।। विठ्ठल नावाने विख्यात असे पणजोबा ।।
आजोबा खंडेराय आणि गंगा नावे आजी ।। राजाचे पिता विठ्ठल व गंगा नाव असलेली जन्मदात्री आई ।। आई समान इतर माता रूक्मिणी, रूक्मिणी ।। लक्ष्मी व सत्यभामा क्रमाने ।। मातामह (आजोबा) गोविंद उडपीत प्रमातामह (आईचा आजा) ।। नरसिंह नावाचे प्रमातामह (आईचा पणजा) आदित्यरूप ही मातामह त्रयी ।। श्रीनिवास, गणपती, कृष्ण हे मामा ।। क्रमाने मामा व पुढील सासरे व केशव हा मंत्रगुरू ।। गोपाल नावाचा आप्त व रघूनाथ या स्वनावे ।। काशी, रमा, जानकी या क्रमाने राण्या ।। सावत्रभाऊ कृष्ण व माधव नावाने प्रसिद्ध ।। पिशाच्यांना मुक्ती देणारा शंभू आणि सर्व पाप हरणारा शिव ।। या मंदिरांच्या नावांचा संबंध या क्रमाने आहे ।। शके १८०० बहूधान्य संवत्सरात ।।
वसंत ऋतू चैत्र (मधु) शुद्ध प्रतिपदा तिथीला बुधवारी ।। या सुश्र्लोक निर्मितीसाठी सुश्र्लोकांचे सूचक ।। रघुनाथ राजाचे आश्रित यांनी शिलालेख कोरण्याचे काम ।। गौरीशंकर याने आनंदाने केले ।। 

दक्षिण तटालगतच्या ३० शिवमंदिराची नावे:
(सौजन्य: तिर्थयात्रा प्रबंध)
१) जगदगुरू शंकराचार्य
२) बाजीराय: कुलयजमान:
३) विठ्ठलोवृद्धप्रपितामह:
४) खंडेराय: प्रपिताह:
५) गंगेतिप्रपितामही
६) नृसिंहेतिपितमह:
७) रमेतिपितामही
८) विठ्ठल:स्वपिता
९) गंगेतिस्वमाता
१०) रुक्मिणीतिमातृसपत्नी
११) रुक्मिणीतिमातृसपत्नी
१२) लक्ष्मीतिमातृसपत्नी
१३) सत्यभामेतिमातृसपत्नी
१४) गोविंदेतीमातामह:
१५) उडपितीमातु:पितामह:
१६) नृसिंहइतिमातु:प्रपितामह:
१७) श्रीनिवासामातुल:
१८) गणपति:श्वशुर:
१९) कृष्ण:श्वशुर:
२०) गोविंद:श्वशुर:
२१) केशवोगुरू:
२२) गोपालआप्त:
२३) रघुनाथ:स्वयंराजा
२४) काशीतिराराजमहिषी
२५) रमेतिराजश्री
२६) जानकीतिराजश्री
२७) कृष्णाख्य:सापत्नोबंधु:
२८) माधवाख्या:सापत्नोबंधु:
२९) पिशाचमोचनेश्वर:शिव:
३०) सर्वपापहरेश्वर:शिव:
विशेष आभार: श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री दिलीप तुंगार, श्री सत्यप्रिय शुक्ल, मनोन खैरनार, सुयोग देवकुटे, अजय हातेकर, समिर वैद्य.
संदर्भ: तिर्थयात्रा प्रबंध, गणेश लेले
पेशवे कालिन त्र्यंबकेश्वर, दिलीप बलसेकर
गौतमी, भारत इतिहास संकलन समिती, नाशिक जिल्हा
त्र्यंबकगड- अंजनेरी-रामसेज, महेश तेंडुलकर
मराठा सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकर, डॉ. डी.एस. कुलकर्णी/प्रा. डॉ. एस.डी.खैरनार

सह्याद्री ट्रेकर ब्लॉगर


सरदार विंचूरकरांचा वंशवेल

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महादरवाजावरचा शिलालेख:


या शिलालेखाचा भावार्थ: श्रीमंत बाजीरावसाहेब (पहिले) पंतप्रधान ह्यांचे पुत्र नानासाहेब यांनी या शिवमंदिरास शके १६७७ संयुवानामवत्सर मार्गशिर्ष अष्टमी भृगूवासर (शुक्रवार) या दिवशी आरंभ केला. पुढे त्यांचे नातू श्रीमंत माधवराव नारायण (सवाई माधवराव) यांच्या अंमलात शके १६०८ पराभव नामसंवत्सर माग वद्य चतुर्दशी रोजी हे कार्य समाप्त झाले. या कामावर नारायण भगवंत म्हणून कारकुन योजिला होता. त्याचे हातून आरंभ होऊन त्याचा पुत्र नागेश नारायण याच्या हातून कार्य समाप्ती झाली. (हे काम एकंर ३ वर्ष चालले होते असे दिसते).


Add caption

पेशवाईतील सर्वोच्च शिल्पकलेचा अविष्कार त्र्यंबकेश्वर मंदिराचे बारीक नक्षीकाम








निलांबीका मंदिरावरचे शिलालेख

निलांबीका मंदिरावरचे शिलालेख

कुशावर्त तीर्थावरील नंदी...


कुशावर्ताच्या बाहेरच्या भिंतीवरील गणपती आणि महिषासुर मर्दिनीस शेंदूर लावण्याचे प्रकार सुरू झालेत...

कुशावर्ताचे नक्षीकलांनीयुक्त प्रवेशद्वार


मुर्त्यांना शेंदूर लावण्याची प्रक्रिया: खरेतर मंदिरावरच्या कातळातल्या मुर्तींना शेंदूर लावण्याचीजुनी प्रथा, परंपरा नाही...तरही काही लोक गणपती, हनूमानाच्या मुर्तींना शेंदूर लावतात.
मग ते लोण इतर मुर्त्यांकडे जाऊन पसरते. एखाद्या मुर्तीला शेंदूर लावल्यानंतर शेंदराचे हात कशाला पुसायचे तर बाजुच्या दगडाला किंवा मुर्तीला. असे करत करत
नंतर तो दगड किंवा ती मुर्ती शेंदूरमय केली जाते. अरे या मुर्तीला कमी शेंदूर लावलेला दुसतो, असे वाटून पुढच्या वेळेस त्यामुर्तीला शेंदूर लावला जाते. कालांतराने हा समज रूढ होऊन
ही जुनीच परंपरा वाटू लागते...





Friday, January 24, 2020

navra navri fort of nashik

नवरा नवरी डोंगरावर इतिहासाच्या पाऊलखुणा



तिथे सासरा आहे. नवरा, नवरी, कलवरी तर आहेच, बामणही आहे. आणि मध्येच डोके वर काढून बसलेला बिडा म्हणजे व्याही देखिल आहे. ही सगळी नावे डोंगरांना दिलेली. जणू इतिहास काळात एखादी वरातच डोंगर रूपाने प्रस्थापीत झालेली. तु्म्हाला ह्या पुरातन लग्नाचे वर्‍हाडी व्हायला आवडेल का? 
नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणी भागात इगतपूरी-घोटी परिसराच्या डोंगररांगेत नवरा नवरी नावाने परिचित असलेल्या ऐतिहासिक स्थानाचा शोध लागून उणीपूरी नऊ वर्षे लोटलीत. हा किल्लाच आहे, यावर नुकतेच एका प्रसिद्ध दुग अभ्यासकाने शिक्का मोर्तब केले. या निमीत्ताने संशोधनाचे एक दालन खुले झाले आहे. नवरा नवरीच्या डोंगरावर गेल्यानंतर आपले उर, आपण अशा पूर्वजांच्या वंशातले आहोत, या विचाराने भरून येते. विशाल अशा डोंगरांना ही नावे कोणी दिली? कुठून झाला असेल या आख्यायिकेचा जन्म? कोणत्या राजवटीत येथे राजकीय हालचाली झाल्या असतील? कुठल्या राजाच्या किंवा सरदाराच्या आदेशाने कातळकडा फोडून भव्य अशी गडवाट तयार झाली असेल? अतिउच्च स्थानावर कातळाचे पोट फोडून त्याच पाणी साठविण्याचे कोणते तंत्र त्या काळी असेल? या डोंगर परिसरात कोणत्या प्रकारच्या राजकीय हालचाली झाल्या. पैकी महत्वाच्या कोणत्या? युद्धाशी संबंधित कोणत्या? राजकीय व्यस्थापन कसे होते? आज सुन्या, वैराण डोंगरावर कोणे एकेकाळी कोण वैभव नांदत असेल? कोणकोणत्या राजवटींची येथे सत्ता होती?
तुम्ही वर्‍हाडी बनून येथे या आणि त्या पुरातन लग्न सोहळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. जमल्यास वेगवेगळ्या राजकीय कालखंडात या ठिकाणच्या घडामोडींचा वेध घ्या. इतिहासाची पाने शोधा. वस्तूसंग्रहालये, जुनी कागदपत्रे खंगाळा, गडवाटा चौफेर पालथ्या घालून दडलेला काही इतिहास मिळतो का याचा शोध घ्या! अशानेच या पुराण प्रसिद्ध महाराष्ट्र भूमीचा गौरवशाली भूतकाळ कळू शकेल.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाडीवर्‍हे येथून १३ किलो मिटर अंतरावर चहुबाजूंनी डोंगराच्या कुशीत वसलेले कुशेगाव आहे. या कुशेगावच्या तीन वाड्या आहेत. पैकी, 'नवरा नवरीच्या डोंगरावर जायचे आहे', असे विचारून शेवटची वाडी गाठावी. तिथून अगदी आरामात चालले तरी तासाभरात आपण नवरा नवरी डोंगराच्या कातळात खोदलेल्या जुन्या पायरी मार्गावर येऊन पोहोचतो. मळलेल्या वाटेने आपल्याला अगोदर डोंगराची खाच लागते. ही खाच दुरवरून आपल्याला धोडपच्या प्रसिद्ध डाईक रचनेतल्या खाचे सारखी भासते, तिथून पाचच मिनीटात हा मुख्य प्रवेश मार्ग लागतो. त्यामुळे अगोदर नवरा नवरीचा डोंगर बघून यायचे. परतीच्या वाटेवर उतरताना या खाचेला भेट द्यायची. त्याशिवाय ही डोंगरयात्रा पूर्ण होणार नाही.
अर्थात तुम्ही सुई दोर्‍या सारखे जाऊ शकतात. कुशेगावातून अगोदर नवरा नवरीचा डोंगर बघायचा. त्या अगोदर वर सांगितल्या प्रमाणे खाच लागती तिला भेट द्यायची. पहिन्याच्या बाजूने उतरून नवरा नवरीच्या सुळक्याच्या पायथ्याने पुन्हा कुशेगाव गाठायचे. भटकंती मोठी करायची असेल तर मग शेवगे डांगवरून अधेली, आठवा असे करून सासर्‍या व त्याच्या तळाने जुन्या घाट वाटेने बिड्याला वळसा घालून तुम्ही नवरा नवरीच्या डोंगरावर येऊ शकतात.
२०११ सालच्या नोव्हेंबर महिन्यात इतिहासाचे अभ्यासक तथा नाशिकचे प्रसिद्ध दुर्ग संशोधक गिरीश टकले यांनी या ठिकाणी भेट देऊन, हा किल्ला असू शकतो, असा कयास मांडला होता. त्याच्या काही महिने अगोदर गिरीश टकले व अविनाश जोशी या नाशिकच्या वैनतेय गिर्यारेाहण संस्थेच्या संस्थापक सदस्यांना इगतपूरी परिसरात अनगड भटकंतीचा शोध घेताना नवरा नवरी नावाच्या डोगराचा सुगाव लागला होता. अंजनेरी किल्ल्याच्या उत्तर दिशेला असलेले नवरा, नवरी व तिची कलवरी या नावाचे सुळके प्रसिद्द आहे. अंजनेरीच्या बरोबर दक्षिण बाजुला पहिन्याच्या जवळ असेत तीन सुळके आहेत. त्यांची नावे सुद्धा नवरा, नवरी, कलवरी आहेत. परंतू हे अंजनेरीचा भाग नाहीत. शिवाय सुळके जरी असले तरी संपुर्ण डोंगराला स्थानिक मंडळी नवरा नवरीचा डोंगर म्हणून संबोधतात. पंचक्रोशीत सर्वत्र हा डोंगर या नावाने ओळखला जातो.
नवरा नवरीच्या डोंगराचे सर्वात माठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मुख्य प्रवेश मार्ग. एखाद्या पसरट सुळक्या प्रमाणे बाहेर आलेल्या कातळातून ही वाट फोडून प्रवेश मार्ग बनविण्यात आला आहे. गिरीश टकले यांनी यापूर्वी नाशिक परिसरात ११ अपरिचीत दुर्ग शोधले आहेत. त्यांच्या शोधक नजरेतून हा भला थोरला कातळ फोडून मार्ग तयार केल्याचे हेरले. सहा वर्षांपूर्वी आम्ही दुर्ग भटक्यांचा एक लहान गट घेऊन या मार्गाने डोंगरावर गेलो होतो. धुव्वाधार पावसात आसपासचे काहीच दिसत नव्हते. जाताने आम्ही वेगळ्याच घळीतून डोंगरावर गेलो होतो तर उतरताना या मार्गावर प्रचंड चिखलामुळे सावधपणे उतरावे लागले होते. डोंगरावर गडाचे गडपण त्यावेळी बघता येऊ शकले नव्हते. तद्वताच आसपासचे डोंगर अत्यंत कमी दृष्यमानतेमुळे दिसू शकले नव्हते.
गिरीष टकले यांनी लिहीलेल्या, सूरतेची लूट की स्वराज्याची भरपाई? ह्या पुण्यातील महाराष्ट्र देशा फाऊन्डेशनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमीत्तेने प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक भगवान चिले नाशिकला आले होते. 'यापूर्वी नवरा नवरीच्या डोंगराला भेट दिली, पण तो किल्ला असावा असे वाटत नाही, म्हणून पुन्हा एक भेट द्यावी', असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
ज्या नावाचे सुळके त्याच नावाचा डोंगर अशी नवरा नवरीची वेगळ्या प्रकारची ओळख आहे.

२० जानेवारी २०२०
दुर्गभटकंती आणि त्यावर वर्तमानपत्रातून लिखाण करणारा इतिहास अभ्यासक सुदर्शन कुलथे याने नवरा नवरी डोंगराच्या शोध यात्रेवर महारष्ट्र टाईम्समध्ये लेख लिहीला होता. हा डोंगर त्याने दोनदा बघितल्याने त्यानेच आजच्या भटकंतीची कमान सांभाळली. महाराष्ट्रात दुर्गअभ्यास संशोधन, संवर्धन तसेच पुस्तक चळवळ राबविणारा पुण्याचा बोंबल्या फकिर, भारतीय रेल्वेचा अभ्यासक तथा सह्याद्री व हिमालयात वेगवेगळ्या वाटांवर गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंड भटकंती करणारा नाशिककर राहूल सोनवणे अशा पाच जणांच्या चमुने साडे अकरा वाजेच्या सुमारात कुशेगावात धडक दिली. भगवान चिले हे महाराष्ट्रातले एक दर्दी दुर्गभटके असून त्यांनी चारशेच्या वर किल्ल्यांना अभ्यासाच्या चष्म्यातून बघितले आहे. भटकंतीच्या छंदातून त्यांची आजवर दहा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. या विषयावर दुर्ग भेटी व व्याख्याने असा त्यांचा व्यासंग आहे. त्यांच्यासाठीच या भटकंतीचे खास आयोजन करण्यात आले होते.
काही परिचित तर काही अपरिचीत डोंगर ओळखत अगदी निवांत पणे आम्ही डोंगर खाचेजवळ येऊन पोहोचलो. कुशेगाव ही आदिवासी बहूल वस्ती. गावचे अर्थकारण पूर्णत: शेतीवर अवलंबून. पक्क्या रस्त्यांचे जाळे, दळणवळणाची वेगवान साधने यामुळे तरूण वर्ग मोठ्या प्रमाणावर गावापासून दूर जाऊन नोकरी धंद्याला लागलाय. त्यामुळे घरातली काही मंडळी शेती सांभाळते तर काही जण नोकरी, व्यवसाय व मजूरी करून उदर्निवाह करतात. महिला मंडळाची तिनस्तरावर कसरत सुरू असते. पाणी शेंदणं, चुल आणि मल सांभाळणे आणि उरलेल्या वेळात शेतात काम करणे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दिसणारे सावत्रिक चित्र येथेही तसेच उमटले आहे.
- डाविकडून सासरा, बिडा आणि सगळ्यात उजव्या बाजुला नवरा नवरीचा डोंगर.

गावचे बुजूर्ग बोरू सराई हे आमच्या सोबत वाट दाखवायला होते. त्यांचे शालेय शिक्षण झालेले नाही, पण परिसरातील हरेक गोष्टींची त्यांना छान माहिती. आपण अनूभवलेले आणि पुर्वजांकडून ऐकत आलेल्या एकएक गोष्टी ते सांगत होते तशी आमची भटकंती बहरत होती. एक सुशिल आणि ज्ञानसंपन्न वाटाड्या लाभणे म्हणजे भाग्यच. अगदी निर्मळ मनाने ते कुठल्याही प्रश्नावर आपली माहिती सादर करायचे. समारच्या सुळक्यांकडे निर्देश करत त्यांनी माहिती दिली, 'ते समोर दिसतात ते नवरा व नवरी बाजुला त्यांची कलवरी आणि डोके आणि ढेरीचा भाग म्हणजे त्यांना बामण म्हणतात'. बाबा ही राब जाळण्यासाठी आत्ताच का अंथरून ठेवली, अजून तर पावसाला उशिर आहे ना? त्यावर बाबांना काय बोलावे कळेने, 'ही तिरींबकच्या बामनाची जमिन, गावसे लोक कसत्यात. वय बरेच असले तरी बाबांचा चालण्याचा वेग आणि एकुणच शरीराची क्षमता आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त असावी असे जाणवत होते. तसे बघितले तर दुर्गम आदिवासी भागातली माणसे काटकच असतात. बोरू सराई वयाच्या मानाने जास्त तंदूरूस्त वाटले.
- गप्पाष्टके किल्ल्याएवढी...

आजचा जमावडा हा दुर्गवेड्यांचा असल्याने दुर्गभटकंतीच्या हरेक अंगाने अभ्यासू, ऐतिहासिक माहितीची देवाण घेवाण घेतच वाट सुरू होती. गप्पांच्या ओघात डोंगरखाचेच्या जवळ केव्हा येऊन पोहोचलो कळलेच नाही. मुख्य प्रवेशमार्गाजवळ येताच भगवान चिले यांनी स्पष्टच केले, डोंगरकड्यातले हे छिद्र नैसगिक नाही. ते कोरून काढलेले. दगड तासून ही वाट बनवलेली. हा किल्लाच आहे याची पावती देणारी ही वाट आहे. भविष्यात आणखी थोडे संशोधन करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही सूचना केल्या. जुन्या मार्गाचे राकट सौंदर्य सर्वजण हरखून गेल्यागत बघत होते. महाराष्ट्रात कातळ कोरून भव्य आकरारातली मंदिरे, लेण्या, प्रवेशद्वार, दिपमाळा आदी बांधकामे कमी नाहीत. नवरा नवरीच्या डोंगराचा प्रवेश मार्ग त्या लौकिकाला साजेसा. या डोंगरावरून मोठ्या लष्करी हालचाली नसाव्यात त्यामुळे साधारण वाटावी आशीच ही मुख्य वाट तयार करण्यात आली आहे. पण त्याला एक छानसा अमूर्त आकार देण्यात आला आहे. अमुर्त शैलीतले चित्र माणसाला कदाचित लवकर कळणार नाही, पण या वाटेची अमुर्त घडण खाशी आकर्षक आहे.
- सुळक्या सारखा बाहेर आलेला कातळकडा फोडून बनविण्यात आलेला नवरा नवरी किल्ल्याचा वैशिष्ट्यपूर्ण प्रवेश मार्ग

इतका भव्य कातळ फोडणे सोपे काम नाही. ते फोडताना बाहेरच्या बाजूने बाह्य आक्रमण रोखण्यासाठी पुरेशा उंचीचा आडोसा आहे. युद्धजन्य स्थितीत या बाजूने आक्रमण करणे सोपी गोष्ट असू शकत नाही. उजव्या हाताला वाटेच्या मधोमध डोंगरदेव स्थापित आहे. मुर्तीच्या रूपात एका दगडी कोनाड्यात दगडाचाच देव पुजतात. वाटेच्या मधोमध एक भलीमोठी शिळावरच्या बाजूने येऊन खाचेत अडकून राहीली आहे. मागे केव्हा तरी कडा तुटून ती कोसळून आली असावी. त्याने या प्रवेश मार्गाच्या राकट सौंदर्यात मात्र भर टाकली आहे. वरच्या बाजूने सतत दगड, माती कोसळल्यामुळे त्याखाली मुळ पायरी मार्ग दबल्या सारखा वाटतो. या मार्गवरून डावीकडून वर आल्याबरोबर एकलहान आकारातला तलाव लागतो. हा तलाव आकृतीबद्ध नसला तरी पाणी साठवण्याकरिता तो व्यवस्थितपणे घडविल्याचे जाणवते. दक्षिणोत्तर दिशेला वैतरणा जलाशय आणि त्याच्या काठावर मोठे पठार असलेला सोळावा नावाचा डोंगर दिसतो. त्याच्यापलिकडे पहिने परिसरातले प्रसिद्द झारवड गाव आणि त्याच्या निकट मोठ्या उंचीचा ढोर्‍या डोंगर लक्ष वेधून घेतो. आपल्या नजरा प्रसिद्ध थळ घाटाचा रक्षक त्रिंगलवाडी किल्ला शोधण्याकडे लागतात, पण तो घाटाच्या अगदी सुरूवातीला असून इथून तो दिसत नाही.
सोळावा डोंगर उर्ध्व  वैतरणा जलाशयाच्या पार्श्वभूमिवर

इथून पुढे वाट उत्तर दिशेकडे जाते. नैसर्गिक दगडांचे काही जोती सदृष्य ढिग दृष्टीस पडतात. संपुर्ण पठार पिवळ्या पडेल्या गवताने आच्छादलेले. काही ठिकाणी लूसलूशीत मऊशार गवताचे पट्टे त्यावर मुक्त लोळण घेण्याचे अमिष सतत दाखवतात. यंदा भरपूर पाऊस झाल्यामुळे गावातच पुरेसा चारा उपलब्ध असल्याने कदाचित डोंगरमाथ्यावर चराई सुरू झाली नसावी. पन्नास वर्षांहून मोठी झाडे मात्र या संपुर्ण परिसरात अभावाने आढळतात.
पहिने घळीतून दिसणारी विनायक खिंड, कार्वी, तळई, सीता गुंफा, कोधळा, मोधळा व त्यांचे रविवार१ व रविवार २ हे सुळके

आता आम्ही उत्तर टोकाकडे आलो. इथली घळ अंजनेरीच्या तळवाडे घळीसारख्या आकाराची. त्यातुन अगदी समोर दिसते ती ब्रम्हगिरीची पूर्व बाजू. पंचलिंगापैकी एक शिखर आणि त्याला लागूनच इंडीमिंडीची खिंड. य खिंडीच्या उजव्या हाताला ब्रम्हगिरीच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेचे प्रतिक असलेले कारवी, तळई, सितागुंफा, कोधळा, मोधळा ही शिखरे आणि त्यांचे रविवार१, रविवार२ या गिर्यारोहकांनी आधुनिक नावांनी बारसे केलेले सुळके दिसतात. ह्या खळीतून तसेच दक्षिण बाजूच्या घळीतून येण्याच्या वाटा आहेत. पण त्या सोप्या नाहीत. उजव्या बाजूच्या कड्यात एक छानशी गुहा लक्ष वेधून घेते. सुदर्शन आणि राहूल यांनी हा सोपा कातळ टप्पा सरसर चढत वाट दाखवली. वर चढून बघितल्यावर आश्चर्य आणि आनंदाला पारावार राहत नाही. दुरून नैसर्गिक वाटणारी ही गुहा खोदून काढलेली आहे. हे एक गुहा टाके आहे. खोदकामावर त्या कामाच्या कालखंडाचा अंदाज येत नाही. पाण्यावर किंचीत हिरवा तवंग होता. तो बाजुला केल्यानंतर पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले. चव उत्तम आणि ते थंडगार लागले.

आज विचार केला तर कातळ अशा प्रकारे छन्नी, हाथोडीने फोडण्याचे कसब चकित करते. त्याहून आश्चर्य म्हणजे पावसाचे पाणी यात कशा प्रकारे साठत असेल. त्या काळचे ते अजोड तंत्र होते, जे आज जवळपास हरवले आहे. आज घडीला अशा प्रकारे टाके खोदण्याचे औचित्य नसले तरी पाणी ही आजच्या जगाची मोठी समस्या आहे. अशा प्रकारे नैसर्गिकरित्या पाणी साठविणे आणि त्याचा वर्षभर दैनंदिन उपयोगासाठी वापर करणे ही आजच्या काळाची अत्याधिक निकड बनली आहे. त्यावर मात्र काम होताना दिसत नाही. आज बांधली जातात ती धरणे, लघू-मध्यम वा मोठे साठवण प्रकल्प खुल्या जमिनींच्या खोलगट भागाचा वापर करून. त्यावर अवाढव्य पैसा खर्च केला जातो. त्याने तहान मात्र सर्व प्रदेशाची भागत नाही. कातळ फोडण्याचे काम इतिहास काळात सुद्धा माठे खर्चिक असेल यात शंका नाही. पण त्याने वर्षभर पुरेल इतके पिण्याचे व वापरण्याचे पाणी उपलब्ध होत असे. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचे हे  वैशिष्ट्य सर्वच जुन्या कातळकोरीव कामातून डोकावते. डोंगरावर जितक्या माणसांना पाण्याची गरज, तितकी तजविज हे त्या काळचे गणित. आणि डोंगर पायथ्याला, नद्या, ओढ्यांच्या काठाला विहीरीतून लोकवस्त्या व नगरांकरिता पुरेसे पारी उपलब्ध व्हायचे. त्यामागे अर्थात भरपूर वनसंपदा, निसर्गातील सर्व जिवांचा वावर व त्यातून जमिनीत पुरेशा प्रमाणावर पाणी मुरायचे. आता माणसाने आपल्या हाताने हे चक्र उलटे फिरवल आहे. जंगल मोठ्या प्रमाणावर नाहीशे केले. निसर्गातले कित्येक जिव हद्दपार केले. वाघ, सिंह, हत्ती सारख्या मोठ्या प्राण्यांची संख्या माणसाच्या बेफाम विकासचक्राने अक्षरश: घटवून टाकलेली. सर्वत्र जंगले कापून त्यावर शेती, रस्त्यांचे जाळे. शेती व दैनंदिन व्यवहारच असा की जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटलेले. एकीकडे हे प्रमाण घटत असताना पाण्याचा उपसा बेसुमार. त्यामुळे भुजल पातळी खालावून शेतीवर जलसंकटाचे सतत सावट. अनेक प्राणी, पक्षी, किटक, माशांची संख्या केवळ माणसाच्या विकासवादळाने घटवली तर दुसरीकडे शेतीपिकावरचे रोग व किडीचे प्रमाण मात्र कैक पटीने वाढलेले. पाणी आणि निसर्गाचे चक्राची उजळणी नवरा नवरीच्या त्या एका गुहा टाक्याने डोक्यात केली तोवर सुदर्शन व राहूलने सोबत आणलेल्या गॅस स्टोव्हवर छानचा चहा बनवला. थोडी फळे, चहा आणि अन्य प्रकारची खादाडी करून गप्पांच्या आवर्तनाने एव्हाना परिसराचा भुगोल आणि दुर्गबांधणी या विषयाकडे वळण घेतले. अर्ध्या तासाचा थांबा हलवून आम्ही आता गुहेच्या वरच्या टप्प्यावर दाखल झालो. एक विस्तीर्ण पठार पाहून मन चक्रावून गेले. पहिने खिंडी पर्यंत दोन टप्प्यात पसरलेला हा तीन किलो मिटर लांबीचा व अर्धा ते पाऊण किलो मिटर विस्ताराचा पसारा असावा. चहू बाजूंनी ताशीव कडे असलेल्या या डोंगरावर येण्याजाण्याच्या अनेक वाटा असल्या तरी त्या संरक्षित करून एक टोलेजंग किल्ला सहज बांधला जाऊ शकत होता. तो का बांधला गेला नसावा याचा अंदाज उत्तर-पश्चिम कड्यावर आल्यानंतर येतो. त्याकरिता इतिहासात थोडे डोकावून बघूया. अपरांत आणि दक्षिणपथ अर्थात कोकण आणि दख्खन यांना सह्य करणार्‍या सह्याद्रीचा घाटाच्या वरचा हा भाग. कोकणात शूर्पारक बंदरावरचा प्राचीन घाटमार्ग म्हणजे थळचा घाट. या घाटाच्या संरक्षणासाठी बांधलाय तो त्रिंगलवाडीचा किल्ला. समुद्र मर्गाने चालणारा व्यापार या या घाटातून होत असे. थट घाटातून वर येणारा व्यापारी मार्ग पुढे पांडवलेणीवरून नाशिकमार्गे उत्तर मध्य भारतापर्यंत पसरलेला होता.
हे गुहा टाके म्हणजे जलव्यवस्थापनाचा अचंबित करणारा नमुना.

आजचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ब्रिटीशांनी बांधलाय. त्याकरिता कसार्‍याच्या डोंगरातून त्यांना तिव्र उताराचा व चढाचा मार्ग तयार करावा लागला. त्या सोबतच त्यांनी अनेक बोगदे खोदून त्यातून रेल्वे मार्ग नेलाय. मुंबईला उत्तर भारताशी जोडणारा पश्चिम रेल्वेचा हा मार्ग. हा महामार्ग आणि रेल्वे मार्ग तयार झाला आणि त्रिंगलवाडीचे व्यापारी महत्व नामशेष झाले. तो नव्हता तेव्हा त्रिंगलवाडी हे या व्यापार मार्गावरचे पहिले मुख्य ठाणे होते. जुन्या काळात त्रिंगलवाडीवरून वाटा दोन दिशांना फुटायच्या. त्यातली एक वाट पांडवलेणी व दुधाळा डोंगराच्या खिंडीतून नाशिक मार्गे जात होती तर दुसरी पहिने बारीतून. या पहिने बारीच्या पूर्व अंगाला अंजनेरी तर पश्चिम अंगाला ब्रम्हगिरी असे दोन टोलेजंग किल्ले. यातील अंजनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व पुरेशा प्रमाणावर प्रकाशात आलेला नाही. त्र्यंबकचा किल्ला मात्र नासिक प्रांताचा बराच काळ केंद्रबिंदू होता. विशेष करून मुसलमानी कालखंडात व मराठा कालखंडात त्र्यंबकगडावरून परिसराची राजकीय कमान सांभाळली जात होती याचे इतिहासात सबळ दाखले मिळतात.

पुरातन बांधकामाच्या खुणा

आता नासिक बारीकडे वळूया. पांडवलेणी-दुधाळ्या खिंडीच्या पश्चिम अंगाला अंजनेरी साधारणपणे वीस किलो मिटर अंतरावर आहे. या अंजनेरीला पहिने, नवरा नवरी पासून थेट आठव्या डोंगरा पर्यत सलग अशी धार आहे. या सलग धारेवर ये-जा करण्यासाठी सगळ्यात सोपा डोंगर म्हणजे नवरा नवरीचा डोंगर. त्यामुळे त्याचा वापर हा संपुर्ण परिसरावर देखरेख करण्यासाठी केला जात असावा. मोठ्या शिबंदीचे प्रयोजन नसल्याने म्हणून त्यावर शक्य असूनही मोठा किल्ला बांधण्यात आला नसावा. अंजनेरीची रक्षक चौकी आणि परिसरावर देखरेख याकरिता लहान शिबंदीची आवश्यकता असावी. त्यादृष्टीने त्यावरून माफक हालचाली होत असाव्या. युद्धजन्य परिस्थितीत पायथ्याला मोठी शिबंदी ठेवण्याची व्यवस्था देखील गेली जाऊ शकते, पण इतिहासात याच्या पायथ्यचा वापर तशा प्रकारे केल्याचे उल्लेक वाचनात आलेले नाहीत. त्र्यंबक किल्ल्याचे संरक्षण, व्यापारी मार्गावर देखरेख या दृष्टीने नवरा नवरीचा किल्ला महत्वाचा ठरतो. याच्या माथ्यावरून अगदी सहजपणे चौफेर देखरेख ठेवता येते.  कोकणचढून वर आल्यानंतर त्र्यंबकगड हा महत्वाचा किल्ला. त्याच्याकडे येण्याची प्रमूख वाट ही दक्षिण बाजूला. त्यामुळे हत्ती दरवाजा या नावाने ओळखला जाणारा त्र्यंबकगडाचा महादरवाजा हा देखिल दक्षिण बाजुला केल्याचे आपल्याला बघायला मिळते.
पुरातन बांधकामाच्या खुणा

साडेचार तासांची भटकंती आटोपून आम्ही परतीच्या वटेला लागलो. माथ्याच्या पठारावर दक्षिण टोकाला जुन्या वाड्याचे भले मोठे जोते आढळले. इथून पाण्याचे गुहा टाके बरेच जवळ आहे. शिवाय वरच्या बाजुला काही सुकलेली टाके दिसले. ते कातळात व्यवस्थितपणे कोरून काढलेले नसली तरी पाणी साठविण्यासाठी घडवल्या सारखे दिसतात. परतीच्या वाटेवर आमचा मोर्चा डोंगरखाचेकडे वळला. याखाचेची दक्षिण बाजू म्हणजे बिड्याचा डोंगर. या बिड्यावर जाता येत नाही, अशी माहिती बोरू सराई यांनी दिली. याला लागून असलेला डाव्या बाजूचा डोंगर हा सोनशिळा म्हणून ओळखला जातो अशी नविन माहिती त्याच्या बोलण्यातून समोर आली. यावर सोने असल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध असून मागे सैन्यदलाकडून त्यावर शोध घेण्याचा प्रयत्न झाल्याचे सराई यांनी सांगितले. तो प्रकार त्यांनी स्वत: बघितला की, त्यांनी ऐकला होता याचा मात्र त्याच्या बोलण्यातून उलगडा होऊ शकला नाही.  सराई यांनी आणखी एक माहिती बोलण्याच्या ओघात दिली, ती म्हणजे, येथे गवळी राजा होता. आपल्याला माहित आहे की, या परिसरात अभिर राजा वीरसेन याची काही काळ सत्ता होती. असे म्हणतात की, वीरसेनने काही काळ अंजनेरीवरून राज्य केले. उत्तरेत या अभिरांची सत्ता महाभारत काळापासून असल्याचे उल्लेख आढळतात.


बिड्याच्या उजव्या बाजुचा डांगर हा सासर्‍या म्हणून ओळखला जातो. काही ठिकाणी त्याचा सासेर म्हणून उल्लेख असून सासर्‍यावर जाऊन आल्याची माहिती गिरीश टकले यांच्याशी केलेल्या चर्चेतून मिळाली.
आता आम्ही पायथ्याच्या दिशेने येऊन पोहोचलो. पुन्हा एकदा बोरूसराईनी सांगितले. ह्या डोगरावरून शेवगे डांगकडे जाणारी जुनी वाट आहे. एक वाट पहिन्याकडे तर खाचेतून पलिकडे झारवडकडे जाते येते. गड सांगोपांग बघून झाला होता. नवरा नवरी नावाची उत्पत्ती कशातून झाली असावी या प्रश्नाचा उलगडा झाला नव्हता. बोरू सराईंना याची हकिकत माहित नव्हती. भगवान चिले यांनी नवरा नवरी नावाचा संबंध विशद करताना सांगितले, पुर्वीच्या काळी नवरी पळविणे म्हणजे सर्वात मोठी मानहानी समजली जायची. काही घाटातून वरातींवर हल्ले करून वरातींना मारल्याचे दाखले कथा कहाण्यातून मिळतात. असा काहीसा इथला प्रकार असू शकतो. सकाळी साडे अकराच्या सुमारास सुरू झालेल्या भटकंतीचा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समारोप झाला.





कुशेगावला लागून असलेल्या शिरसाटे गावातले विरगळ


 मध्यापर्यंत शेती केली जाते. येथे त्र्यंबकच्या ब्राम्हणांची वंशपरापरागत जमिनी असल्याचे स्थानिक सांगतात.

डोंगरवेड्यांची शोत्रयात्रा

वाटेवर आढळलेली खाजकूयरी

 बिडा डोंगराला सासर्‍या पासून विलग करणारी खाच
छानशा पानपेट्या...यात बनतील बिया...




'हा जाणिवपूर्वक कातळ खोदून तयार केलेली वाटच आहे'

नवरा नवरी डोंगरावर या तलावात सर्वाधिक काळ पाणी राहते

तलावाच्या जवळ असलेली जोती

झिरपणे वाढल्याने हा तलाव लवकर आटला...

लहानसा सडा


कातळात खोदलेली गुहा पाहून पावले थबकली

बोरू सराई...जून्या सर्व कथा कहाण्यांनी भरलेले अनूभव संपन्न जीवन

इतिहासाच्या पाउलखुणा कॅमेर्‍यात बंदिस्त करताना भगवान चिले

माध्यावर तिनएक किलोमिटर पसरलेला विस्तीर्ण पठारी प्रदेश

तत्पूरूष, ईशान, अघोर, सद्योजात, वामदेव ब्रम्हगिरीची पंचलिंग शिखरे

सुफळ भेटीचे समाधान देणारी भटकंती...


भटकंतीतले सर्वात कडवे आव्हान या कड्यावर ठिकठीकाणी लागले आहे...
मला आहे रंग...मला आहे रूप...मी पिते पानी..मी खाते उन!









कुशेगावातून दिसणारा नवरा नवरीच्या डोंगराचा विस्तीर्ण पसारा 
सासर्‍याचा डोंगरही भला पसरलेला...

विशेष आभार:
गिरीश टकले,
भगवान चिले,
सुदर्शन कुलथे,
रवि पवार,
राहुल सोनवणे,
राजेश दीक्षित,
प्रा. पी.एस.सोनवणे
बोरू सराई

उपयूक्त संदर्भ:
अपरिचित आणि दुर्लक्षित दुर्ग नवरानवरी