Saturday, January 7, 2012

संत्या गेला...हास्य तरी टिकवू!

Hereafter the PIMPAL PAR
of NEHRU CHOWK will feel
the void of our near and dear
friend in photographer V.Santosh


गेल्या काही दिवसांपासून नाशिकचा सोमवारपेठ परिसर अक्षरश: सुन्न झाला आहे...गणेशवाडी भागातील जनताही एका धक्क्यातून बाहेर पडलेली नाही...संत्या गेला...व्ही.सोतोष - फोटोग्राफर आपल्यात नाही...तो निघालाय अनंताच्या प्रवासाला...आम्हा सगळ्यांना सोडून...

त्या नव्या प्रवासात तो काय अनूभवत असेल...साल्याची तिथेही चांगली मजा असेल...आम्ही मात्र या रहाट गाड्यातल्या चाकाभोवती घुटमळत राहणार...अजुन काही काळ तरी...तसा तो इथे सुद्धा हसतमुखच जगला...

त्याचं दोन ओठ जुळवून ते पसरवत नेणारं हास्य म्हणजे एक ट्रेड मार्कच..
अगोदरच पसरट मिशी...त्यात ते हास्य भारी खुलायचं...पठ्ठ्याला कोणतं बाळकडू मिळालं होतं कुणास ठाऊक...समोर आल्या आल्या त्याच्या ट्रेडमार्क हास्याची झलक मिळायचीच...असं कुणी सांगावं की, संत्या आज समोर आला...पण आपलं ट्रेडमार्क पसरट हास्य त्याने दाखविले नाही...

संत्याचा मित्रपरिवार म्हणजे काही फार मोठा पसारा नव्हता...बहुतांशी परिसरातलेच...नेहरू चौकात निरंतरांच्या ओट्यावर आआल्यावाचून त्यांचा दिवस सरत नाही अशांपैकी संत्याही होता...माझ्या घराला खेटून निरंतरांचा वाडा असल्याने त्याचे ते पसरट हास्य मी अगणितवेळा अनुभवले आहे...


दिवाळीत माझ्या वर्कशॉपवर
दिवाळीत माझ्या वर्कशॉपवर अचानक तो सायंकाळच्या वेळेला आला होता...माझ्याशी कधी कधी फोटोग्राफीबद्दल थोडंफार बोलायचा...पण त्याने माझ्या आकाशकंदिल बनविण्याच्या छंदाचे त्यावेळी तोंडभरून कौतुक केले होते...मी मात्र का...कुणास ठाऊक त्याच्याशी आरोग्य विषयावर बोलण्यावरच भर दिला...

‘पुण्यात माझी एन्जियोग्राफी करून आलोय‘ हे सांगितले तेव्हा...तुला काय गरज...तु तर भला तंदुरूस्त दिसतोस...डॉक्टर मंडळी काहीही सल्ला देतात असं काहबाही बोलला...घरचं खावं...मुला-बाळांसोबत, कुटुंबासोबत थोडे सुखाचे क्षण घालवावे...हसत रहावे....थोडं फार जॉगिंग सकाळी करावं...आहारावर नियंत्रण ठेवावं...अशी थियरी त्याने त्यावेळी बोलून दाखविल्याचे मला चांगले स्मरते.

वीस बावीस वर्षे नाशिकच्या मेनस्ट्रीम पत्रकारितेत, त्यात बारा, पंधरा वर्षे क्रीडापत्रकारिता केल्यामुळे आणि शालेय वयापासूनच विविध खेळ खेळण्याचा, ते बघण्याचा, त्यावर लिखाण-डॉक्युमेन्ट्रीज करण्याचा आणि ओघाने क्रीडाक्षेत्रातील असंख्य  व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे माझ्यावर फिटनेस, आरोग्य, आहारशास्त्र या सारख्या गोष्टींचे संस्कार घडलेत...याचा अर्थ मी फुलप्रुफ तंदुरूस्त आहे...दुडूदूडू पळत असतो असे नाही...पण तरीही एखादा हसतमुख, पापभिरू माणूस आपल्या मित्रांना न सांगता असा पुढे निघून जाणे म्हणजे कसा चटका लावते याची अनुभूती सोमवारपेठ, गणेशवाडी भागात अनेक जण अनुभवत आहेत.

...चहा घेतल्यानंतर पाणी
आपल्या माहितीचा इतरांना किती उपयोग होतो...मोठी मेणसे तर परंपराच कथन करत असतात...आणि आपली परंपरा जगात थोर...तरीही आम्ही ती का अव्हेरतो...चहा घेतल्यानंतर पाणी पित जाऊ नको म्हंटले तर आम्हाला पाणी पिण्याचा अधिकच चेव येतो...दोन आहारात पुरेसे अंतर असावे...पोट पुर्ण भरू नये...जेवताना व जेवल्यानंतर फार पाणी घेऊ नये...अंबट...गोड पदार्थांची मात्रा नियंत्रीत असावी...कडू...तुरट प्रकारांचे सेवन आवर्जुन करावे...संद्याकाळीच जेऊन घ्यावे...उशिरा जेऊ नये...न्याहारी नियमीत घ्यावी...अशा किती तरी गोष्टींचे अमुल्य सल्ले म्हणजे तर आमच्या कानावरून वार्‍या  प्रमाणे निघुन जातात...

आपल्या पूर्वजांनी दिलेली संशोधन व अनुभवाची शिदोरी  आम्ही अशी वाया घालवतो....बनतो फक्त चवीचे गुलाम...त्यामुळे ज्या चविने बटाटेवडे चघळतो...ती मजा आम्ही आईने बनविलेली कारल्याची भाजी खाताना घेऊ शकत नाही...आमच्या शरीरात पिष्टमय पदार्थांची भरपूर मात्रा जात असते...त्या तुलनेत प्रथिने...उपयुक्त आम्ल व इतर घटकांचे संतुलन राखण्याचा जाणिवपूर्वक विचार आम्ही कुठे करतो...आम्ही तर चविचे गुलाम....

...वकिलवाडीत काल गप्पांचा फड
ज्या दुधातुन मानवी शरीराला फार काही मिळत नाही ते आम्ही चांगले चाळीस रूपये लिटर दर मोजुनही आणतो...त्या चाळीस रूपयात किती भाज्या येतील...पण भाज्या म्हणून किती प्रमाणावर शरीरात जातात...खरे तर दुधाच्या...तेला-तुपाच्या रकमेत आम्हाला प्रथिने मिळविण्याचे स्वस्तातले कितीतरी स्त्रोत आहेत...सोयाबिन...मोड आलेली कडधान्ये...राजमा...चणे...हिरव्या भाज्या...असे कितीतरी स्वस्त पदार्थ...पण आम्हाला हवी असते चव...आम्ही तर चविचे गुलाम...वकिलवाडीत काल गप्पांचा फड रंगला तेव्हा फाळके फिल्म सोसायटीच्या फडक्यांनी अरब अमिरातीत त्यांच्यावर (किंवा त्यांच्या हृदयावर गुदरलेली आपबिती सांगितले...त्यानंतर अन्नपदार्थांबद्दल त्यांनी कसा दृष्टीकोण बदलला...बारा-पंधरा वर्षांपूर्वी ऍन्जियोप्लास्टी पश्‍चात राहणीमानात कसे बदल केले हे कथन केले...अर्थात कारण होता संत्याच...

भारतीय मंडळींनी मोठ्या प्रमाणावर आपल्या पारंपारीक आहारपद्धतीला सोडचिठ्ठी दिली...पण खरे तर प्रत्येक ऋतुता...सणासुदिला घरात केल्या जाणार्‍या पदार्थांचे महत्व अनन्यसाधारण....आम्ही फक्त म्हणतो की आमचा आहार जगात श्रेष्ठ...पण खरा भारतीय आहार हल्ली घेतं कोण...प्रथिने व इतर घटकांचे शरीरात संतुलन आहे की नाही याचा विचार करतं तरी कोण...हृदयक्रीयेला अडथळा असा सहजासहजी येत नाही...नव्वद...पंचाण्णव टक्क्यांच्यावरर अवरोध असल्याशिवाय मुख्य रक्तवाहिन्यातले प्रवाह असे सहजासहजी बंद पडत नाही...ऐंशी, नव्वद टक्के अवरोध निर्माण होण्याची वाट बघण्यापेक्षा आत्ताच तपासणी करून घ्यायला हवी...आहाराकडे चव म्हणून न बघता भोजनाकडे औषध म्हणून बघितले तर...आमचेही उरलेले दिवस सुखात कटतील नाही...पुढे संत्याच्या भेटीला जायचे आहेच...पण इथला मुक्काम असा अकाली आटोपायचा का?