Tuesday, November 9, 2021

कोकणकड्याचा आकाशकंदिल

 

 

हा आकाशकंदिल कोकणकड्याच्या अंधारात उठून दिसत होता. उद्देश होता गडावर दुर्ग दिवाळी साजरी करण्याचा, तिथे पडलेल्या विरांना श्रद्धांजली वाहण्याचा. कोकणकड्याने आजवर अमाप समाधानाचे क्षण दिलेत. आपल्याकडून त्याच्यासाठी ही छोटीशी पुजा! तो ती स्विकारेल? 

तो नजरेत तो मावत नाही। छायाचित्रात समावत नाही। एक मैलाचा अर्धवर्तुळ। जमिनीपासून ३००० फुट।
हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा। कितीही पहा मन भरत नाही। महाराष्ट्राला पडलेलं हे राकट कणखर स्वप्नच! त्याच्या सानिध्यात अनेक उन्हाळे पावसाळे व्यतित केलेत. 'एखादी दिवाळी तिथे साजरी करावी, कोकणकड्याच्या भव्यतेला साजेसा एखादा मोठा पारंपारिक आकाशकंदिल तिथे लावावा', हे स्वप्न अनेक वर्षांपासून मनामध्ये रुंजी घालत होते. यंदा तो योग आला. तसं कोणतंही पूर्व नियोजन नव्हतं. आमचा व्यवसाय हा दिवाळीशी निगडीत असल्याने घरून सुट्टी मिळण्याचा प्रश्नच नव्हता. लक्ष्मी पूजनच्या दिवशी `घरात एक मोठा लक्ष्मीबॉम्ब फुटला', अशा प्रसंगी सर्वात मोठा आधार असतो तो मित्रांचा. सह्याद्रीतर मित्रांचा मित्र, ठरवलं त्याच्या कुशीत जाऊन दिवाळी साजरी करायची. 'कोकणकड्यावर जाऊन धडक मारायची. तिथे एक भव्य आकाराचा कंदिल बसवायचा'. सणावाराला कोणी सोबत येण्याची शक्यता नव्हती, तेव्हा एकट्यानेच जाण्याचा निर्णय घेतला. सहज म्हणून सन्मित्र दीपक पवारला साद घातली तर तो तयार झाला. जोडीला संतोष उगले तयार झाले. एक बारा पंधरा फुटाचा कंदिल बनविण्याचा बेत पक्का झाला. 
इतकामोठा कंदिल हरिश्चंद्रगडावर नेणे अशक्य; तेव्हा तो तिथे जाऊन बनविण्याचे ठरवले. त्यासाठी भरपूर तयारी करावी लागणार होती. लक्ष्मीपूजनचा संपुर्ण दिवस त्यासाठी हातात होता. आपला पारंपारिक पद्धतीचा भारतीय आकाशकंदिल म्हणजे भूमितीची एक आकृती. ती  त्रेरिकोणात काही रेषा जोडून तयार होते. त्रिमितीय पद्धतीने बनवायचा तर बांबूच्या किंवा लाकडाच्या बारीक काड्या योग्य मापात तयार कराव्या लागतात. त्यांची जोडणी करण्यासाठी त्यांची टोकं योग्य कोनात छाटावी लागतात. ही सगळी तयारी सुरू केली. आमच्या कार्यशाळेतून देवदार लाकडाच्या एकसमान अडीच फुटाच्या काड्या गोळा केला. एकसमान नव्हत्या. पण काम भागणार होते. योगायोग म्हणजे अगदी मोजक्या काड्या मिळाल्या. एकही जास्तीची नाही मिळाली. 

या कंदिलाच्या आकृतीत ८ त्रिकोण, ८ आयात, ८ चौकोन तयार करावे लागतात. ४८ काड्यांचा संच तयार झाला. कोकणकड्यावर जोरदार वारे वाहत असतात त्यामुळे कागदा ऐवजी कॉटनचे रंगीबिरंगी कपडे लावण्याचे ठरवले. रंगसंगती ठरवून ते आकारात कापून घेतले. साचा तयार करण्यासाठी तारचुका, हाथोडी, पक्डक, दोरी इत्यादी साहित्य जमा केले. इतका मोठा कंदिल लावायचा तर त्यावर गडाच्या नावाचे सुलेखन करणे आवश्यक होते. त्यासाठी प्रसिद्द चित्रकार सूदर्शन तळेकर आणि मुर्तिकार मानसिंग ढोमसे यांची मदत घेतली. सामानाची तजवीज करताना रात्रीचे १०-०० वाजून गेले. घरात लक्ष्मीपूजनाचा सण असूनही दोघांनीही त्यासाठी वेळ दिली. ढोमसे यांच्या कार्यशाळेत जाऊन कंदिलाच्या चार बाजूंकरिता हरिश्चंद्रगड ही अक्षरे पिवळ्या कपड्यावर रेखाटून घेतली. आता रात्रीचे ११-३० वाजलेले. तोच लक्षात आले की, कंदिलासाठी लागणार्‍या झिरमिळ्या तयार करायच्या राहून गेल्या. मग परत माझ्या कार्यशाळेत जाऊन ७ फुटाच्या झिरमिळ्या कापून घेतले.

पुनर्वापर केलेल्या देवदार लाकडाच्या काड्या


दिडएक महिन्यापासून सह्याद्रीत कोणतीही मोठी भटकंती झालेली नव्हती, त्यामुळे ट्रेकचे सामान इस्तत: पसरले होते. ते गोळा करून घरी आकाशकंदिलाचे सामान एकदचे गोळा झाले. ६० लिटरची पाठपिशवी भरून तयार झाली. तोवर १-३० वाजून गेला. 

दीपकची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पहाटे ४-४० वाजता त्याचा फोन घणघणला. प्रेमभराने त्याने, 'उठ', म्हणून साद घातली. कालचा दिवस दगदगीचा होता. त्याअगोदरचा महिना दिड महिन्या काळ कामाच्या धामधूमीचा होता. रोज रात्री एक दिड वाजता काम आटोपायचे. दिवसभर सतत कामच काम सुरू असायचे, त्याचाही शीणवटा होता, अन्यथा रात्रीच पाचनईत धडक मारून अंधारात चढाईचा बेत होता. मरगळ झटकून तयार झालो. पावणे सहा वाजता गंगापूर पाईपलाईन रस्त्यावर दीपकचे घर गाठले. दोघे असतो तर मोटरसायकलने रवाना झालो असतो. आता तिघे असल्याने दीपकने त्याची चारचाकी काढली. 

नासिक ते पाचनई हे अंतर एका बाजूने सव्वाशे किलो मिटरचे. पाचनईतून हरिश्चंदगडावर चढाईचा सर्वात सोपा मार्ग. घोटी पर्यंतचे ४८ किलो मिटरचे अंतर चहाचा थांबा धरून ४० मिनीटात पार झाले. तिथून पुढचा टप्पा म्हणजे राजूर. नगर जिल्हयाती अकोले तालुक्यातले हे ठिकाण म्हणजे तमाम भटक्यांचा महत्वपूर्ण थांबा. घोटीवरून ३२ किलो मिटरचा हा टप्पा म्हणजे एक मोठे आव्हानच. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि वनविभाग यांनी घोटी ते राजूर परिसरात दहा वीस पर्यटन स्थळे तरी विकसीत केली आहेत. त्यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. या मार्गावर बारा महिने आठोकाळ पर्यटकांचा राबता असतो. गेल्या काही दिवसांपासून मुंबई परिसरातून शिर्डीला जाणारे भाविक नासिकला न जाता घोटी वळण मार्गाने शिर्डीला जाणे पसंत करतात. त्याने त्यांचे सुमारे पन्नास किलो मिटर अंतर वाचते. असे असूनही घोटी - सिन्नर रस्ता हा चंद्राच्या पुष्ठभागाशी स्पर्धा करणारा, म्हणजे चंद्रावर जास्त खड्डे की या मार्गावर. पर्याटन विकास करताना अगोदर तिथे जाणारा रस्ता उत्तम करण्याची गरज आहे. आजमितीला महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी हेच चित्र थोड्या फार फरकाने बघायला मिळते. त्या उलट शेजारील गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्र यांनी आपल्या रस्त्यांचा दर्जा सर्वोत्तम राखला आहे. महाराष्ट्राला तो राखण्यात कोणती अडचण आहे? झालं आम्हाला या ३२ किलो मिटर अंतरासाठी एक तास लागला. सुदैव म्हणजे पूर्वीपेक्षा रस्त्याचे काही टप्पे दुरूस्त करण्यात आलेत. घोटीपासून संपूर्ण रस्ता हा डोंगर भागातून जाणारा, जास्त पावसाच्या प्रदेशातला. त्याला साजेशे रस्ते बनविणे  आजवर कोणत्याही राजवटीत शक्य झाले नाही. रस्ते दुरूस्तीचा हा अनूशेष भरून काढल्याशिवाय पर्यटन विकासाला गती येणार नाही. तेव्हा ठरवून या ठिकाणी जागतिक दर्जाचा मार्ग तयार करण्याची आवश्यकता आहे. 



राजूर ते पाचनई हा मार्ग अधिक डोंगराळ व दोन लहान घाटरस्त्यांचा. इथे प्रवासाची खरी परिक्षा. बघूया २७ किलो मिटरसाठी किती वेळ लागतो ते. 

हा संपूर्ण परिसर वनविभागाने वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन विकासासाठी संरक्षित केला आहे. अलीकडे त्यात काजवा महोत्सवाची भर टाकली आहे. त्यावर अनन्यसाधारण असा खर्च केला आहे. दर दोन पाच वर्षांनी पर्यटन स्थळावर बांधलेले निवारा स्थळे (पॅगोडे), लोखंडी नळकांड्यांचे संरक्षक कठडे, शिड्या इत्यादीवर कोट्यावधी रूपये खर्च केला जातो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सोबत घेऊन जर एकत्रितपणे पर्यटनाचा विकास केला तर या नितांत सुंदर निसर्गस्थळी उत्तम दर्जाचे रस्त्यांचे जाळे तयार करता येऊ शकते. जास्त पावसात टिकणारे रस्ते तसेच सरपटणार्‍या प्राण्यांच्या व पावसाच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी निष्काषन मार्ग असलेले रस्ते ही काळाची गरज आहे. 

आम्ही पाचनईला अडीच तासात पोहोचलो. मध्ये कुठलाही थांबा घेतला नाही. म्हणजे ५ किलो मिटर अंतरासाठी सरासरी अर्धा तास लागला. आता आमची स्पर्धा वेळे सोबत सुरू होणार होती. इतका मोठा आकाशकंदिल बनविण्यासाठी पाच तास लागणार होते. जास्त वेळ लागला असता तर अंधारात कोकणकड्यावर आकाशकंदिल बसविणे दुरापास्त ठरले असते. बरेच दिवस डोंगरावर चालण्याचा सराव नव्हता हे जाणवत होते. पाठीवर गच्च भरलेली ६० लिटरची पाठपिशवी. त्यात मागच्या महिन्यात शरीरात बी१२ व्हिटॅमिनची घटलेली मात्रा आणि दिवाळीत जाणवलेला सर्दीपडशाचा त्रास, याचा परिपाक चालण्याच्या वेगावर झाला नसता तर नवल. एरवी दिडतास हरिश्चंद्रगड चढून होतो, आज दोन तास लागणार अशी चिन्ह दिसू लागली. दीपक हा नियमीतपणे गडकिल्ले फिरणारा असल्याने तो सूसाट निघाला. वर जाऊन कंदिल लावण्या सोबतच आम्हाला हरिश्चंद्रगड परिक्रमेचे नियोजन करायचे होतो. हा महाराष्ट्रातला आकारमानाने सर्वात मोठा किल्ला याच्या वीसहून अधिक वाटा. त्यासाठी आम्ही बेलपाड्याचा कमा आणि कमळू पोकळा यांच्याशी संपर्क केला. मागे भास्कर बादडशी या विषयी बोलणे झाले होते. आज भास्करचा संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा कमाला नळीच्या वाटेने गडावर येण्यास सांगितले. तो म्हणाला तुम्ही पोहोचा, मी दोन तासात वर येईन. 

गड चढत असताना कमाचा फोन आला, ''वातावरण ढगाळ झाले असून भात झोडून तो कणग्यात सुरक्षित करणे महत्वाचे आहे आज येऊ शकणार नाही.'' ढगाळ वातावरणामुळे हवेत दमटपणा वाढला होता. चालताना त्याचाही त्रास जाणवत होता. 



गणपती धारेला खेटून असलेल्या विशाल कड्याची आडवी वाट गाठायलाच ५१ मिनीटे लागली. इथुन पुढे पाण्याच्या वाटेपासून मंदिराच्या दिशेने न जाता कोकण दरवाजाच्या वाटेला लागून असलेल्या आडवाटेने कोकणकडा गाठायचा प्रस्ताव मांडला. ही वाट आजवर न केल्याने ती शोधण्याचे आव्हान होते. सुदैवाने पाचनईचा सुदाम बादड त्याच्या झोपडीसाठी लागणारे सामान घेऊन जात होता, वाटेत त्याची भेट घडली. स्थानिक मंडळी त्याच मध्यम मार्गाने जाते. तो म्हणाला यंदा ही वाट मळलेली नाही, पण या वाटेने गेलो तर लवकर पोहोचू. 



पर्यटक, ट्रेकर मंडळी सहसा या वाटेचा वापर करत नसल्याने वाटेचे निर्जन रूप टिकून आहे. मंगळगंगेचा प्रवाह ओलांडल्यानंतर मात्र काहीसा अंगावर येणारा घसारा लागतो. इथे आमच्या तंदूरूस्तीचा कस लागला. कोकणकडा गाठायला २ तास १५ मिनीटे लागली. पाठीवरचे ओझे, सरावाचा अभाव आणि इतर कारणांमुळे पंचवीस एक मिनीटे जास्तीची लागली. सव्वा वाजेच्या सुमारास आम्ही कोकोकणकड्यावर स्थितीत सुदाम बादडच्या झोपडीत बस्तान मांडले. तो त्याच्या कारवीच्या झोपडीला बाहेरच्या बाजूने शेतात वापरली जाणारी हिरवी नायलॉन जाळी चहूबाजूंनी लावणार होता. झोपडी पाना गवताने शाकारलेली होती तर पाण्याची गळती थांबविण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला होता. आज तो जमिन धोपटून सारवून घेणार होता. 

कंदिल बनविण्यासाठी पाच तास मिळणार होते. आजवर डोंगरावर जाऊन कधीही कंदिल बनवला नव्हता. तिथे कोणकोणत्या अडचणी येणार काहीच कळत नव्हते. सुदामने छान कोरा चहा टाकला. तो रिचवून कंदिलासाठी लागणार्‍या लाकडाच्या चौकटी बनवायला घेतल्या. मातीवर पट्ट्या उभ्या करून खिळा बसत नव्हता. मग आम्ही बाहेर खडकावर जाऊन चौकटी ठोकू लागलो. खडक सपाट नसल्याने काही वेळा खिळे बाहेर निघत होते तर काही खिळे बरोबर बसत होते. ही सर्व कसरत सूरू असताना पावसाचे टपोरे थेंब सुरू झाले. 

कंदिलासाठी लागणार्‍या लाकडाच्या ४८ काड्या मोजून आणल्या होत्या. त्यातील काहींना योग्य त्या कोनात छाटून घेतले होते. एकपण जास्तीची काडी नव्हती. हाथोडीची घाव जपून मारणे क्रमप्राप्त होते. एका काडीला गाठ असल्याचे लक्षात आले. नेमकं त्या काडीला खिळा नीट बसला नाही आणि झालं, काडी गेली मोडून!

काडी मोडल्यावर ऐनवेळी जोडण्यासाठी काही बारीक पट्ट्या आणल्या होत्या. चौकटीची एक काडी कमी भरली. 'घरून निघताना एक काडी कशी काय कमी पडली. की ती सामान भरताना राहून गेली'. आता मोठी पंचाईत झाली. सुदामला विचारलं की एखादी बारीक पट्टी मिळेल का? तो म्हणाला कारवीची चालेल का? एक मोडलेली आणि एक कमी! आजवर कारवीला कधीही खिळा मारण्याचा प्रसंग आला नव्हता. तिची टोकं ४५ अंशात छाटावी लागणार होती. त्यासाठी वर कोणाकडे करवत नव्हती. मग संतोष अण्णांनी कोयत्याने ती छाटून दिली. कारवीच्या काडीतून किमान एक खिळा अचूक मारणे आवश्यक होते. शिवाय कंदिलाची जोडणी करताना कारवी आणि गाठेची काडी असलेली चौकट कंदिलाचा भार येणार नाही अशा बेताने लावावी लागणार होती. चौकटी तयार होईस्तोवर ३-२० वाजून गेले. आता पुढेआणखी एक संकट आमची वाट बघत होते.

इतका मोठा लाकडी सांगाडा कशाने जोडायचा कशाने? त्यासाठी तारेची आवश्यकता होती. नेमकं तारा राहून गेल्या. बांधकामाच्या तारा कुठेही सजपणे मिळतात. गडावर इतक्या झोपड्या आहेत पण त्या सर्व झाडाच्या फांद्याच्या खाचेत बांबू बल्ल्या लाऊन उभ्या केलेल्या. पकड, हाथोडी, करवत अशी अवजारे ही मंडळी वापरत नाही. तोच दीपकने भोजन अवकाश घोषित केला. लोणचं, पोळी, पापडाची चटणी असा मोजका बेत पोटात गेला आणि डोक्याची वात पेटली. गिर्यारोहणात कशाच्याही पक्क्या गाठी मारल्या जाऊ शकतात. दीपकला सोबत दोरी आणायला सांगितली होती. ती कशाची हे सांगितले नव्हते. या ठिकाणी जाड चांभारी दोरा उपयोगाचा ठरला असता. दीपकने कपडे वाळविण्याची नायलॉनची दोरी आणली होती. त्याला वाटलं या दोरीला कंदिल बांधायचा आहे. त्यासाठी मी पक्की सूती दोरी आणली होती. दीपकला नायलॉन दोरीचे एक फुटाचे तुकडे करायला सांगितले. तिचे वेणी सारखे तीन पदर सोडविल्यानंतर बारीक दोरी मिळाली. साधी बैलगाठ आणि त्याला अंगठागाठीने सुरक्षित करून आमचा साडे पाच फुटाचा भव्य असा सांगाडा दुपारी साडे चारच्या सुमारास उभा राहिला. 

कंदिल चालला कोकणकड्यावर...

कोर्‍या चहाची आणखी एक फेरी घेतल्यानंतर कंदिलेला रंगसंगती प्रमाणे कापड चढवायला सुरूवात केली. त्यासाठी गन टेकर आणली होती. जसे कागद स्टेपलरच्या पीनने एकत्र ठेवतात तशी ही गन टेकर. चित्रकार मंडळी हिच्या मदतीने लाकडी चौकडीवर कॅनव्हास ठोकतात. एक प्रकारे लाकडावर चालणारे हे स्टेपलर. आता आणखी एक संकट उभे राहिले, स्टेपलरच्या पुरेशा पिना सोबत आणल्या नव्हत्या. काल सामानाची जुळवा जुळव करताना दोन पाकिटे टाकली, परंतू त्यात पिना कमी होत्या. प्रत्येक चौकट, त्रिकोण आयाताला किती पिना लागणार याचा हिशेब करून सोबतच्या पिना पूरविल्या. झिरमिळ्या आणि सजावटीसाठी सोनेरी चमकीचे काठ लाऊन बरोबर ६-०७ वाजता कंदिल एकदाचा उभा राहिला.

आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. सोबत दोन बॅटर्‍या आणल्या होत्या. त्या कंदिलात लावण्याचे ठरवले होते. सोपानने त्याची सौर वीजेवर चालणारा एलईडीचा बल्ब देऊ केला. कोकणकड्याला उंचावर कंदल बांधणे गरजेचे होते. त्यासाठी त्याच्या झोपडीचे दोन उंच बांबू काढून घेतले. ढगाळ हवामानामुळे कोकणकड्यावर सूर्यास्त दिसला नाही. तिथे काही जणांचे तंबू लागले होते. त्यातील काही मित्रांना साद घालून मध्यमार्गाच्या बरोबर वर कंदिल लावण्याची तयारी सुरू केली. त्यात बॅटरीचा उजेड टाकताच 'हरिश्चंद्रगड' ही अक्षरे उठून दिसत होती. पिवळ्या चौकोनांना बाजूने भगवे, हिरवे, निळे त्रिकोण आणि वर व खालच्या बाजूला लाल पांढरे आयात अशा बहूरंगातला हा कंदिल कोकणकड्याच्या अंधारात उठून दिसत होता. उद्देश होता गडावर पडलेल्या विरांना आजव दिवाळा पाडव्याच्या दिवशी श्रद्धांजली वाहण्याचा. कोकणकड्याने आजवर अमाप समाधानाचे क्षण दिलेत. आपल्याकडून त्याच्या लेकरासाठी ही छोटीशी पुजा तो स्विकारेल का? हा प्रश्न मनात डोकावून गेला. कोकण कड्याला नळकांड्यांचे संरक्षक कठडे बसविल्याने तो काहीसा खट्टू झाला आहे. भला मोठा आकाशकंदिल पाहून त्याने मोठ्या मनाने त्याचा स्विकार केला. दोन काठ्या एकमेकांना जोडून त्याच्या मध्ये हा कंदिल मध्यमार्गाच्या अगदी वर ऐटीत विराजमान झाला. अवघा कोकणकडा दिपावलीच्या आनंदात न्हाऊन निघाल्यासारखा भासला. तळाच्या बेलपाडा आणि आसपासच्या वाड्यांचे लुकलूक दिवे जणू कोकणकड्याच्या आकाशकंदिलाकडे न्याहाळताता भासत होते. उरी बाळगलेले अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार झाले होते. 



पूर्ण अंधार दाटला आणि कोकणकड्याचा हा आकाशकंदिल दुर अंतरावर जाऊन आम्ही न्याहाळत राहिलो. दुरून तो आणखी सुंदर भासत होता. वार्‍याचा वेगही मंद होता. इकडे सुदामने बाजरी व तांदळाचे पिठ एकत्र केलेली भाकरी, वरणभात आणि झणझणीत रशाची बटाटा बाजी बनवून ठेवली होती. अडीच तीन गरमागरम भाकरी भाजी अशी भरपेट पोटपूजा आटोपून झोपडीबाहेर आलो तर कंदिल हवे सोबत डोलताना दिसला. कड्या जवळ झोपून नका आज वारं जास्त असेल अशी कल्पना सुदामने दिली. त्याच्या झोपडीबाहेरच दोन तंबु लावण्याची तयारी केली. तोच एक पाणदिवड सळसळताना दिसली. हा काळ्या रंगाचा बिनविषारी साप, चावतो मात्र कडकडून, वृत्तीने अतिशय आक्रमक, प्रसंगी तो मांस बाहेर काढतो अशी त्या बद्दलची ख्याती ऐकलेली. तो पकडण्याच्या भानगडीत न पडता सुदामने त्याला काढीवर उचलून झोपडीपासून दूर नेले. 



हल्ली शनिवार व रविवार नेहमीच जोरदार गार वारे वाहते ही माहिती त्याने पुरवली. आम्ही दोन एक चकरा मारून कोकणकड्यावरचा कंदिल बघून आलो. तो त्याने स्विकारलेला होता. त्याची कुठलीही मोडतोड झाली नव्हती. रात्रभर खरोखरच जोरदार वारे वाहत होते. त्यातही त्याची कोणतीच क्षती झालेली नव्हती. सकाळी आन्हिके उरकून कंदिलात लावलेला दिवा काढून घेतला आणि पुन्हा तो नव्याने बांधला. मग आमची पावल कोकणकड्याच्या दक्षिण टोकाकडे वळली. तिथून रोहीदास आणि माकडनाळेचे विहंगावलोकन केले. दुर अंतरावरून कंदिल छोटा छोटा होत दिसेनासा होईस्तोवर आम्ही कोकणकड्याचा एक टोक गाठले. तिथून तारामतीचे शिखर आणि बालेकिल्ला हा बेत तडीस नेण्यासाठी आम्ही कोकणकड्याच्या आकाशकंदिलाला नमस्कार केला!

।।जय हो।।

नासिक ते पाचनई प्रवासासाठी लागलेला अंतर आणि वेळ...

नासिक (०) किलो मिटर) ६-२०

घोटी (४८ किलो मिटर) - ७-०५

राजूर (३२ किलो मिटर) - ८-०५

पाचनई (२७ किलो मिटर) १०-३५

------

एकूण अंतर व वेळ = (१०७ किलो मिटर) 

४ तास ०५ मिनीटे


 -
या छायाचित्राचे वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच्या अंधारात उजळलेल्या तळाच्या वाड्या, पारूंडी नदी आणि हरिश्चंद्रगडावर उगम पावणार्या काळू, हरिश्चंद्रेश्वरी नदीच्या कुशीतल्या



दीपक पवार,  संतोष उगले...मोलाची साथ.




इथे याची आवश्यकता नाही

इथे कशाला हवे नळकांड्यांचे  संरक्षक कठडे....







हरिश्चंद्रगडावर काय विज नेण्याचे नियोजन आहे


तिथल्या निसर्गसौंदर्याची हे कळेना मेळ साधे





Monday, August 9, 2021

इंद्राई - साठपाटीची वाट

 
इंद्राई किल्ल्याची साठपाटीची वाट

वातावरण मरणाचं सुंदर होतं। सातमाळेतल्या प्रत्येक डोंगरावर आज ढगांचा मुकुट धरला होता। गच्च हिरवाईने बहरलेल्या काळ्याशार डोंगरांना निळ्याशार आकाशाची पार्श्वभूमी। त्यावर पांढरेशुभ्र पुंजके। ढगांची स्पर्धा होती 'आभाळाची निळाई' झाकोळण्याची। जिथे कुठे ढग कमी पडायचे ते नील गगन डोंगरांचे रूप निखरायचे। आणि वारा? तो काळ्याकभिन्न डोंगरांना लपेटलेली ढगांची मखमाली दुलई हलकेच विस्कटायचा। हा खेळ किती काळ बघत रहावा। स्वर्ग यापेक्षा वेगळा असू शकतो का? टोलेजंग इंद्राई किल्ल्याच्या साठपाटीची दुर्मिळ वाट जोखताना, आयुष्यभर जपून ठेवावी अशी ही अनूभूती। सर्वांगसुंदर सह्याद्री भ्रमंतीची!

नासिकच्या सुरगाणा तालूक्यापासून ते अगदी हैदराबादेपर्यंत पसरलेली सह्याद्रीची प्रमुख डोंगररांग, जिचा उल्लेख 'अजिंठा - सातमाळा' असा केला जातो. यातला सातमाळा हा उल्लेख नासिक जिल्ह्यात असलेल्या डोंगरांपूरता केला जातो. मनमाड पर्यंत ही रांग ५० मैल इतकी पसरलेली. तिथून ती राजापूर, कासारी असा वळसा घेत खान्देशला विभागते. (तशी ती नाशिक जिल्ह्याला देखिल एका अखंड डोंगरमाळेने विभागते; ही इतकी सलग आहे की, तुम्ही अचला पासून ते थेट चांदवड पर्यंत डोंगरावरून चालत जाऊ शकतात) तिथे मराठवाड्याच्या सीमेवर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी निर्माण केल्या गेल्या. तिथून पुढे ती बेरार प्रांतात प्रवेश करते. बुलढाण्यातून अकोला, यवतमाळ, परभणी, निझामाबाद असा हैदराबादेपर्यंत तिचा विस्तार. 

नासिक जिल्ह्यात मोडणार्‍या सातमाळा रांगेला चांदोर किंवा चांदवडची डोंगररांग या नावाने ओळखले जाते तर अजिंठा परिसरात इनहायद्री या नावाने. हा इनहायद्री शब्द कशाची फोड करून बनलाय? तो अपभ्रंशातून आला असावा? इंग्रजांनी बर्‍याच शब्दांचे अपभ्रंश केलेत (तद्वताच अनेक ठिकाणी अगदी बिनचूकही वापरलेत) हा इनहायद्री शब्द त्यांच्या आकलनातून आलेला की, भारतीय परंपरेतला हे स्पष्ट झाले नाही. पण हा इनहायद्री शब्द इंद्राईशी मेळ खाणारा. इंद्राई आणि सह्याद्री अशा संयोगातून तो निर्माण केला जाऊ शकतो. हा अगोदरच कुठेतरी वापरात असावा असे दिसते. एका भल्या मोठ्या डोंगररांगेला ज्याचा शब्द दिला जाऊ शकतो तितकी महत्ती इंद्राईची नक्कीच आहे हे त्याचा अफाट विस्तार आणि त्यावर विखुरलेल्या पुरातत्वीय अवशेषांचे भरमसाठ प्रमाण पाहून स्पष्ट होते. असे असूनही आपल्या बद्दल फार थोडी माहित या 'शैल सुंदरी'ने जगाला उघड केलेली दिसते. प्रचंड आकारमान

सातमाळा डोंगररांगेतला सर्वात मोठा व देखणा पुरातन लेणी समूह इंद्राईवर आहे. जसा एक रांगेत देखण्या कातळ कोरीव स्तंभांनी मंडित लेणी समूह सर्वोच्च भागावर आहे काहीसा तसाच तो खालच्या भागात जिथून कातळभाग सुरू होतो त्यापायथ्याला पूर्व बाजूने सुद्धा करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. अर्थात तिथे अशा लहान खोल्या रांगेने कोरण्याचे प्रयोजन वेगळे असू शकते. शिवाय त्यावर नक्षी कामही केलेले आढळत नाही. हा एक फार मोठा मोठा पसारा असलेला किल्ला आहे. हा आकारमानाने अंजनेरी, हरिश्चंद्रगडाच्या तोडीचा. याचा वरचा भाग म्हणजे काहीसा आयाताकृती एक प्रचंड आकारमानाचा अखंड खडक. हा खडक चहूबाजूंनी सरळसोट उभा. कुठे शंभर तर कुठे दिडशे फुट उंच. आभासी तंत्राने मोजून पाहिले तर हा तीन किलो मिटरहून अधिक भरतो. याचे क्षेत्रफळ डोळे विस्फारणारे चार लाख सत्त्याहत्तर हजार आठशे शहात्तर पुर्णांक दहा शतांश वर्ग मीटर म्हणजेच एक्कावन्न लाख त्रेचाळीस हजार आठशे पंधरा पुर्णांक बावन्न शतांश वर्ग फुट इतके भरते.




दोन पायरी मार्ग

माणूस या कातळावर जाणे शक्य नव्हते तेव्हा जुन्या हिंदू राजवटीत यावर जाण्यासाठी पायरी मार्ग तयार करण्यात आला. यासाठी सुमारे दिडशे फुट उंचीचा सरळ उभा कातळकडा त्याच्या तळापासून छन्नी हाथोड्यांनी तासून पायर्‍यांचा मार्ग बनविलेला. या पार्‍यांची रूंदी कुठे १० फुट तर कुठे २५ फुट. अगदी नावाला साजेशी अशी या राजमार्गाची घडण. त्याच्या वैभवाच्या काळात सह्याद्रीतल्या सर्वात देखण्या बांधीव राजमार्गापैकी हा एक असावा याची प्रचिती त्याचे भग्न रूप पाहूनही येते. 

एक दोन पाच पायर्‍यांचा छोटा टप्पा चढून गेल्यावर कड्यात कोरलेला हा राजमार्ग सुरू होतो. तो काटकोनात डावीकडे वळण घेतो. डोंगराचा मजबूत कणखर दगडी किनारा लाकूड तासावं इतक्या सफाईने तासून काढला आहे इतके हे अफाट तासकाम. यातून दोन हत्ती सहज जाऊ शकतात इतकी त्याची भव्यता. अर्थात ही वाट दुर्घट पद्धतीने घडविलेली, म्हणजे वर जनावरे नेता येणार नाही अशी अवघड बनवलेली. घोडासुद्धा वर नेणे शक्य नाही. पायदळाला उंची आणि उंच पायर्‍यांवरून जाणे सोपे होऊ नये असाच. 

तिथून पुढे राजमार्ग उजवीकडे वळतो. हा भला मोठा पायरी मार्ग म्हणजे दिडशे फुटाचा खडक सरळ कापून तयार केलेला. त्याच्या वरच्या भागात अलिवर्दी खानाचा फार्सी भाषेतला तो प्रसिद्ध शिलालेख आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. राजमार्गाची रचना एवढी संरक्षित की, त्यावर शत्रुला सरळसरळ हल्ला करणे अवघड. कोणी वर येण्याचा प्रयत्न केलाच तर गडावरून त्याचा अस्त्र किंवा दगड आदींनी मोठ्या प्रमाणावर प्रतिकार केला जाऊ शकतो अशी ही रचना.

तोफांचा मारा करायाचं ठरलं तर त्यासाठी कुठे जागाच नाही. लांब  अंतरावरूनही तोफांचा मारा करणे कठिण. मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला करायचा तर शत्रूला डोंगरांच्या कोंढावळ्यात येणे भाग. तिथे आल्यावर त्याचा निभाव तो काय लागणार. इंद्राई चहूबाजूंनी निसर्गत: संरक्षित होताच. त्याच्या प्रवेश मार्गाची रचनाही संरक्षित स्वरूपाची. त्यावर हल्ला करण्याचा विचार स्वप्नात सुद्धा कोणाला आला नसेल. 'हा पडला असेल तर केवळ शिष्टाईने' किंवा पल्लेदार तोफांचे यूग अवतरल्यानंत. स्पष्टच सांगायचे तर इंग्रजांनी मोठ्या अंतरावर मारा करणार्‍या तोफांनी आणि बंदूकाची कार्यक्षमता वाढल्यानंतरच भारतीयांवर विजय मिळवला. समोरासमोर बाण, भाले तलवारीच्या युद्धात भारतीय योद्ध्यांवर विजय मिळविणे कठिण होतं. राजमार्गाची निर्मीती भारतात दारूचा वापर होण्याच्या पूर्वीची निश्चीत. आजचा विषय राजमार्ग नाही. आजची भटकंती थरारक अशा साठपाटीची किंवा साठ पायर्‍यांच्या वाटेची. तेव्हा आपण त्याकडेच वळूया.

राजमार्ग हा पुर्व उत्तर कड्यात जेथे डोंगरधार दक्षिणाभिमूख होते त्याठिकाणी तर साठपाटी याच्या अगदी पलिकडे दक्षिण पश्चिम कड्यात, सर्वोच्च कातळ टप्प्याच्या खालच्या कातळ टप्प्यात कोरलेली. इंद्राईची पूर्व बाजू अंतर्वक्र आकाराची. एका भल्या लांब आडव्या वाटेने राजमार्गापासून साडे तीन रोडग्याच्या डोंगराच्या धारेला याची एक धार थेट जाऊन मिळते. त्याच्याच खालच्या बाजूला साठपाटी. काही भटक्यांनी साठपाटी दोन टप्प्यात विभागल्याचे म्हंटले आहे. एक ६० पायर्‍यांचा व थोडे अंतर राखून पुढे ३० पायर्‍यांचा. त्यांनी केलेली ही नोंद योग्य वाटत नाही. कारण आम्हाला ११५ पायर्‍या लागल्यात, डावीकडे सरळ गेल्यानंतर पुन्हा डावीकडे वर चढत जाणार्‍या.  दोन स्वतंत्र पायरी समूह लागले नाही. पायर्‍या चढून गेल्यानंतर सरळच साडेतीन रोडग्याकडे जाणार्‍या डोंगरधारेची वाट लागली.  

आपल्या अंगाखांद्यावर असंख्य कातळ कोरीव भग्नावशेष बाळगून असलेला इंद्राई हा राजधानीचा किल्ला होता. एका महत्वाच्या घाटावरचा पण मुख्य मार्गापासून काहीसा आत. याच्या पश्चिम बाजूला भावडबारीचा घाट तर पूर्व बाजूस राहूड घाट. जुन्या काळापासून या घटांनी मोठी वर्दळ अनूभवली आहे. इंद्राई किल्ल्यावरची जुनी बांधकामे आणि कातळातले भग्नावशेष एक दोन भेटीत पाहून होत नाहीत. 

साठपाटीच्या पायर्‍यांची रचना कमालीची सौंदर्यपूर्ण...

साठपाटी...साठ पायर्‍यांची वाट

पाचवीला पुजलेला कामाचा व्याप, ब्रम्हगिरी आदी डोंगरावर दगडखाणी आणि अधिकारी-पुढार्‍यांच्या निसर्ग गृहप्रकल्पांमुळे नासिकमध्ये तिव्र होत चाललेली सह्याद्री बचाव चळवळ, महामारीच्या रपाट्यात धंद्यातली अद्वितीय मंदी अशी कमालीची निराश मनोवृत्तीत असतांना, कोणी जर कुठल्या शोधयात्रेला साद घातली तर? त्या आवतनाचे काय होणार? 'ताणतणावावरचे सर्वोत्तम औषध म्हणजे सह्याद्री'. त्रिशतकी दूर्ग सफरींकडे वाटचाल करणारा सन्मित्र दीपक पवारने साठपाटीच्या भटकंतीची माहिती घेऊन ठेवली हाती. पायथ्याच्या देहेणेवाडीत भगवान ढगे यांच्याशी त्याचे बोलणे झाले होते. मागच्या आठवड्यात केलेल्या बाफळ्या डोंगराच्या शोधयात्रेच्या वेळी आम्ही देहेणेवाडीत जाण्याचा विचार केला हाता. परंतू बाफळ्या उतरताना जोरदार पाऊस लागला. त्यामुळे खाली उतरायला उशिर झाला. अशी ही दुर्लक्षीत, रोमहर्षक, थरारक साठपाटीची वाट. ही साठपाट म्हणजे नक्की काय असावी याचा काहीच अंदाज येत नव्हता. बैलगाडीच्या साठ्याच्या आकारासारखी कमनीय रमणीय पायर्‍यांची रचना म्हणून तर नसेल ना हे नाव दिलेले, किंवा मग तिच्या ११५ पायर्‍यांची विभागणी ६० आणि ५५ अशी करून त्यालाच ढोबळमानाने साठपाटी किंवा साठ पायरीची वाट असे नाव पडले असावे?

दीपक म्हणाला तिन जण होतील. जायचे का? म्हंटलं चला. मग तीनाचे पाच झाले. लागोलाग तिन कमीही झाले. मग दोघांनीच निघण्याचे नियोजन केले. पावसाळ्यात साठपाटी घसरडी असणार. त्यावाटेने फारच थोडी मंडळी जातात. वाटाड्या नाही मिळाला तर आपला आपण मार्ग शोधू, कुठे गरज भासली तर सुरक्षेसाठी दोर असतोच. निफाडवरून दीपक घंगाळे, अमोल जाधव आणि... असे आणखी तिघे डेहेणेवाडीत दाखल झालो. तिथे नवनाथ ढगे त्याचा चुलत भाऊ असा मोजका चमू देहेणेवाडीतून मंगरूळ - भावडबारी हा उत्तम दशेतला डांबरी रस्ता ओलांडून पावणे दोन किलो मिटर अंतरावर आपण मतेवाडीत दाखल झालो. भगवान म्हणाला गाड्या इथेच उभ्या करू. तिथून इंद्राईचा पायथा आणखी एक किलो मिटर अंतरावर. ही मते वाडी म्हणजे इंद्राईची दक्षिण बाजू. गावाला लागूनच बुधा नावाचा डोंगर आणि त्याला लागून असलेली डुक्कर नाळ ही इंद्राई व कोळधेर यांच्यात जाणारी घाटवाट. अर्थात ती तीचे पुरातन रूप सांभाळून आहे. त्यामुळे साठपाटीने वर जाऊन डुक्कर धारेने उतरण्याचे आजचे नियोजन होते. अशा पद्धतीने इंद्राईच्या दोन वाटा दृष्टीपथात होत्या. एक साठपाटीने जाऊन वर चोर वाटेने माथ्यापर्यंत पोहोचायचे आणि कोल्ह्या बाफळ्याच्या दिशेने उतरून बुध्याला वळसा मारून डुक्करधारेने खाली यायचे. बेत तर नामी होता.

बुध्याला लागून इंद्राईचा किल्ला ही त्याची दक्षिण बाजू. किल्ल्याची सर्वात कमी विस्तार असलेली बाजू. इतर तिनही बाजूंनी त्याचा विस्तार मोठा आहे. मतेवाडी कडून इंद्राईला स्थानिक मंडळी सोडली तर वर सहसा कोणी जात नाही. त्यातही गुरे चारून आणण्यासाठी किंवा लाकूड फाटा आणण्यासाठी हिचा वापर केला जायचा, हल्ली तोही जवळपास बंद झाला आहे. याचे कारण म्हणजे आता कोणी जास्त गुरे सांभाळत नाही. ट्रॅक्टर प्रत्येक दारात दिसते. शेळ्या मेंढ्या राखण्याचे प्रमाणही जवळपास संपलेले. स्वयंपाकासाठी इंधन म्हणून घराघरात गॅस आलेला. ज्यांच्याकडे नाही त्यांना गरजेपूरता लाकुडफाटा खालच्या भागात मिळून जातो. त्यामुळे वाट फारशी मळलेली नाही. पायथ्या पासूनच काटेरी बोरी, घाणेरीतून वाट शोधण्याचे आव्हान. वाट चुकली की झुडपांनी कपडे ओढून धरलेच म्हणून समजा. एकतर गाडी बरीच दुर उभी करावी लागते. तिथून मोठी पायपीट. सकाळच्या उत्साहात तशी ती जाणवली नाही. वातावरणच इतके सुंदर होते की, पाय किती अंतर कापत आहेत आणि वाट किती घसरडी, काटेरी झुडपातून जाणारी याचे भान उरले नव्हते. काही ओहळींचा परिसर शेवाळलेला त्यामुळे ओलांडण्यास अवघड, आज त्या ओहळी लिलया पार होत होत्या. हा परिणाम नितांत सुंदर वातावरणाचा. 

पावसाची ओढ

यंदा नासिक जिल्ह्याला पावसाने मोठी ओढ दिली. पावसाचे माहेर घर म्हणून ओळखले जाणारे घोटी, इगतपूरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या भागात पावसाची सरासरी कमालीची घसरली. इतकी की, भाताच्या पेरण्या आषाढ महिना येण्याच्या बेतात असताना अजून पूर्ण झालेल्या नाही. भाताची पेरणी लांबणीवर म्हणजे पावसाची सरासरी कमालीची घसरलेली हे समिकरण. याभागात अशी घटना ही दुर्मिळात दुर्मिळ. भाता सोबतच भूईमूग आदी पेरण्याही खोळंबलेल्या. त्याचे पडसाद चांदवडच्या याभागात बघायला मिळाले. ज्यांनी मातीत तलाव खोदून मेनकापडाच्या लहान तलावात पाणी साठविले त्यांना सोयाबीन, कोबी आदी पिके घेतलेली तर ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा नाही त्यांची शेतं नांगरून ठेवलेली. काही मोजक्या ठिकाणी बागायत क्षेत्र फुललेले तर काहींनी पहिल्या दोन पावसांवर पेरण्या उरकलेल्या. या भागात लहान लहान वसत्या तशी शेतातली ठिकठीकाणी घरे. त्यामुळे शेतीची उत्तम देखभाल केलेला हा परिसर. डोंगराच्या पायथ्याला काळीभोर माती तर तिथून पुढे काही मिटरपासून मुरमाड स्वरूपाची जमिन. पिंकांची निवडही नव्या काळाला अनूसरून अशी. विदेशातून आलेल्या सोयाबीनचा अधिक बोलबाला. कुठे द्राक्ष, उस, टमाटा, कोबी, युरोपियन गोड मका अशी पिके घेतलेली.

mountains from the chandwad and manmad region with clear visibility 

समोर चांदवडच्या पलिकडचे सर्व डोंगर आज स्पष्ट दिसत होते. हडबीची शेंडी, कात्रा, गोरखकड, अंकाई-टंकाई या बाजूने हा डोंगर समूह वेगळा आनंद देत होता. शिवाय त्यावर ढगांचे भलेमोठे आवरण, लख्ख प्रकाश, आकाशाची निळाई अशा मनोहारी वातावरणात चालण्याचा वेग मंदावणे स्वाभाविक होते. जमेल तितके दुरचे डोंगर बघताना औंढा पट्ट्याच्या पलिकडची कळसुबाई रांग शोधण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतू त्याभागात ढगदाटी आणि धूसरपणामुळे ते दिसले नाही. मळलेली वाट न सापडल्याने गायवाटेने आता भराभर उंची गाठली जात होती. साठपाटीची वाट ही डेहेणेवाडीतूनही दिसते. कातळात कोरून काढलेल्या पायरी मार्गाचे सौंदर्य सर्व बाजूंनी भुलवणारे. जवळ गेल्यावर, 'पूर्वकाळात काय देखणं काम करून ठेवलयं', असे अस्फुट गौरवोदगार निघाले नाही तर नवल. 

या पायर्‍या ठिकठीकाणी सतत रिसणार्‍या पाण्यामुळे शेवाळलेल्या. उजव्या बाजूला थेट दरीत कोसळणारा उभा कडा. याची कातळातली संरक्षणबाजू अस्तित्वात होती. ही वाट नक्कीच इंग्रजांनी राजधेरच्या युद्दानंतर सुरूंग लाऊन उधवस्त केलेली असणार. येथे दोर अडकविण्याची सोय नसल्याने एकाने पुढे जाऊन सुरक्षा दोर पुरवायचा व शेवटच्याने खालच्या बाजूने आणि मग शेवटच्या गड्याला वरच्याने सावकाशपणे सुरक्षा पुरवायची असे नियोजन करून आम्ही हा मार्ग पार केला. गावातली मंडळी मात्र तशीच पुढे निघून गेली. आता साडेतीन रोडग्याच्या डोंगराला जोडणार्‍या इंद्राईच्या धारेवर आम्ही येऊन पोहोचलो. स्पष्ट वातावरणामुळे हिरव्याशार डोंगरांचे सौंदर्य डोळ्यात साठत नव्हते. हा भाग भल्या मोठ्या सपाटीचा. इथून इंद्राईची पूर्वबाजू अंतवक्र स्वरूपाची. 

डुक्कर घळ

वातावरण खुपच सुंदर होते. त्याच्या सोबत दमाटपणाही तितकाच. नकळतपणे शरीरातून घामावाटे भरपूर पाणी निघून जात होते. भटकंती म्हंटलं की आव्हानात्क वाटा. वरच्या बाजूने दगड, दरड कोसळण्याची शक्यता गृहीत धरून कुठे थांबायचे? कधी थांबायचे? याचे गणित जुळविणे महत्वाचे असते. आम्ही साडे तीन रोडग्याच्या डोंगराला जोडणार्‍या इंद्राईच्या धारेवरच थांबण्याचे ठरवले. तिथे एक सपाट स्वच्छ खडक जणू आमच्यासाठीच अंथरलेला होता. सोबत आणलेल्या डब्यांवर ताव मारून आम्ही येथेच दुपारचे जेवण उरकले. आजची भटकंती तशी फार उशिरा सुरू झाली. आम्हाला ढेहेणेवाडीतून निघायला १०-१५ वाजले तर इथवर पोहोचायला १२-४०. भल्या सकाळी घरच्या मंडळींने प्रेमाने तयार केलेला स्वयंपाक अशा मनोहारी वातावरणात अधिकच रूचकर लागतो. कोणी हिरव्या मिरचीचा ठेचा, कोणाकडे सर्व कालिन लोकप्रिय बटाटा भाजी, एकाने भेंडी, एकाने गिलके अशा घरच्या बनलेल्या मस्त चवदार भाज्यांची ही दमदार मेजवानीच.

खालच्या बाजूने साठपाटी सारखी व्यवस्थित घडलेली पायरी वाट असेल तर वरच्या बाजुला शेवटचा कातळ टप्पा पार करण्यासाठीही वाट असायला हवी ना? इथे तसे काही दृष्टीस पडले नाही. साडेतीन रोडग्याच्या सपाटीवरून मुख्य कातळाला लागून असलेली एक लहानशी अनगड खडकाळ वाट चढून आम्ही राजमार्गाच्या दिशेने कुच केली. इथून इंद्राईचा विशाल टप्पा दृष्टीस पडतो. ऐतिहासिक वाटावी अशा वाटेची कोणतीही खुण इथे दृष्टीस पडत नाही. ही अगदी डोंगराच्या कडेने जाणारी अतिशय जोखिमेची आडवी वाट (traverse). हा अतिशय दाट झुडपांचा भाग. झुडपे कुठे पुरूषभर उंचीची तर कुठे डोक्याच्याही वर जाणारी. छानसे हिरवे जाड बारीक मध्यम पात्याचे विविध प्रकारचे गवताचे पुंजके, अनेक प्रकारची चीरपरिचीत झुडपे, त्यातून जाणारी ही वाट अजिबात सोयीची नाही. बर्‍याच ठिकाणी जेमतेम पाय ठेवायला जागी, तिथून सरळ दरीत उतरणारा घसारा. नजर वर करून चालण्याची सोय नाही पण खाली बघूनही चालता येत नव्हते इतकी झुडपांची दाटी. कुठे चिखल तर कुठे दगड शिळांचे खंड तर कुठे मोठाले अनगड दगडी ठोकळे. साठपाटी चढताना दमटपणा जाणवत होता तो या ठिकाणी जास्त जाणवायला लागला. वेळेवर खाणे पिणे होऊनही जीव पाणी पाणी करत होता. शरीराचे पाण्याचे गणित बिघडल्याची ही लक्षणे. असे का घडते? याचे सरळ सोपे उत्तर म्हणजे घामावाटे, उच्छवासातून बाहेर पडणारे पाणी शरीरात भरून निघत नव्हते. मला व दीपकलाही हा त्रास जाणला. स्थानिक मंडळी पुढे निघून गेली होती. 

दाट हिरव्या गचपनातली वाट शोधण्याचे दिव्य...☺


थरारून टाकणारा पाऊस स्तंभ

एका खडकातल्या ताज्या झर्‍याचे पाणी पिऊन आम्ही थोडी विश्रांती घेण्याचे ठरवले. दीपकचे डोळे लालेलाल झाले होते. साडेतीन रोडग्यावर ऊन सावलीचा खेळ सरू होता. अखेर तो आलाच...इतका वेळ ज्याने दम काढला तो पाऊस! पावसाच्या सरी सुरू झाल्या आणि काहीली करणार्‍या आमच्या जीवाला थंडावा लाभला. एका बाजूला अंधारलेले तर  समोर लख्ख उन आणि मध्ये पाऊस सरी असे तिन प्रकाशछटांचे हे जिवंत दृष्य. समोरच्या बाजुला अंस्पष्टशा पावसाच्या तीन भिन्न छटांच्या रेषा आकाशातून कोसळताना दिसत होत्या. तो स्तंभासारखा कोसळणारा पाऊस होता. म्हणजे आजूबाजूला सर्वत्र हलकासा शिडकावा तर मध्ये स्तंभ होऊन पडणारा पाऊस. असा चमत्कारीक पाऊस आजवर कधीही बघितला नव्हता. समोर हिरवाकंच साडे तीन रोडगा आणि त्यावर हे तीन स्तंभ. मागून उन्हं येत असल्याने पावसाचे थरारून टाकणारे चित्र. हा पाऊस शिडकाव्याच्या स्वरूपाचे फार जोर नसलेल्या बारीक थेंबांचा. फार वेळ चालणार नाही हे त्याचा जोर पाऊनच कळत होते. वारा मात्र आपला पूरेपूर जोर दाखवून अगणीत थेंबं दूरवर फेकत होता. थोड्याच वेळात तो थांबला.

आमच्या थकव्याचे कारण होते ते कडक उन आणि ढगांमुळे तयार झालेला दमटपणा. भरीस भर म्हणजे जमिनीत आद्रता असल्याने तो जास्त वाढला. भली मोठी आणि सतत चढत जाणारी चाल या मुळे घाम आणि उच्छवासातून पाणी बाहेर जात होते. त्यातुलनेत शरीराची पाण्याची तुट भरून निघत नव्हती. पाणी नियमीत न प्यायल्याने एकदम पाणी पिऊन भागत नाही. मला तर सकाळी उठल्या बरोबर अडीच ते तीन ग्लास गरम पाणी पिण्याची सवय आहे. तरीही आज शरीराची पाण्याची गरज भागली नव्हती. वाटेत थोडे थोडे थांबून तीन वेळा घोट घोट पाणीही घेतले होते, तेही पुरले नाही? थोड्याशा विश्रांती नंतर तरतरी आली. पावसाची सर थांबली. आमची चाल पुन्हा सुरू झाली. हिरव्याकंच वनराईचा अंगाला सतत स्पर्ष होत सुखावणारी वाट. पायाखालची जमिन अस्थिर, असमतल दगड चिखलाची, खाली थेट दरी. अंगात आलेला थकवा, त्यामुळे सावधपणे आमची वाटचाल सुरू होती. 

vertical fortification neat and immaculate wall construction that stood test of time

शंभर फुट उंचीचा तट

राजमार्गाच्या अलिकडे तीन डोंगर नाळा वर जातात त्यात दुसर्‍या नाळेत चोरवाटेवर खिडकी किवा दरवाच्या दोन चौकटी लांबूनच दृष्टीस पडल्या. अगदीच उभ्या चढणीचा हा पायरी मार्ग कोसळलेला दिसत होता. त्याच्या अलिकडची नाळ खालपासून वर पर्यंत चौकीनी दगडांची भली मोठी भिंत बांधून संरक्षित केलेली आश्चर्यकारक रचना दिसली. अशा प्रकारच्या तटभिंती सह्याद्रीत अगदी अपवादात्मक. इंद्राईवर राजदेरच्या बाजूने येतानाही एक अशीच बरीच मोठी भिंत डोंगरनाळेची वाट बंद करण्यासाठी बांधल्याचे दिसून येते. २०१८च्या भेटीत ती भिंत आम्ही बघितली होती. जुन्या बांधकामाच्या सफाईदार आणि बिनचूक कामाचा परिणाम असा की, शेकडो वर्षे या भिंती तसुभरही हलल्या नाहीत. इतकं श्रेष्ठ दर्जाचं जुनं काम बघितलं की, आजच्या सिमेंट थांपुन केल्या जाणार्‍या अल्पजीवी तकलादू बांधकामांची किव येते. आजचा महाराष्ट्रात पुराणवास्तू संवर्धनाच्या कामाचा दर्जा पाहिला तर हे काम केवढे श्रेष्ठ होते याची प्रचिती आल्या वाचून राहत नाही. शासन लाखो, करोडो रूपये काही गडांच्या संवर्धनासाठी खर्च करतं. आज आधूनिक बांधकाम साधने उपलब्ध आहेत. तळाला दगड घडवून ते गडावर नेण्यासाठी बांधकामाचे रज्जूमार्गही वापरण्यात येतात. तरीही जुन्या बांधकामाच्या आसपासही आपण पोहोचू शकत नाही? डोंगराची दिडशे ते दोनशे फुटांची दरी चक्क घडवलेल्या चौकोनी दगडांची भिंत बांधून बंदिस्त करायची म्हणजे अभियांत्रिकी आश्चर्याचा नमूना. गुरूत्वीय बल मापून ट्यूब लेव्हल व्यवस्थित तपासून केलेले हे अतिशय सफाईदार बांधकाम. इतकेच नव्हे. त्याल सांधणारा चुना केवढा समर्पक मळलेला. त्यावेळचे चुना मळण्याचेही अजोड असे तंत्र, जे आजच्या आपल्या शासन व्यवस्थेला ठाऊक नाही. (तोरणा किल्ल्यावर दोन वर्षांपूर्वी आठ कोटी रूपये पुरातत्व विभागासाठी मंजूर करण्यात आले होते. तोवर गडावर त्यांनी भरपूर डागडूजी करून ठेवली. अत्यंत बेजबाबदारपणे पुरातत्व नियमांचा सरसकट भंग करणारे लोखंडी नळकांड्यांचे संरक्षक कठडे बनवले. ना ते कठडे टिकले ना तो चुना. शेवटी आले ते सिमेंट कॉंक्रिटवर. आणि निर्णय कसला तर आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी गडावर दुर्ग इतिहासप्रेमींना मुक्काम करण्यावर बंदी. कशासाठी ही बंदी? ही मोगलाई लागून चालली की जुलमी युरोपियन राजवट? ज्यांचा एकदिवसात अभ्यासपूर्ण पद्धतीने तोरणा बघून होत नाही. त्यांनी पुन्हा खाली उतरायचे? पुन्हा दुसर्‍यादिवशी गड चढून उरलेला भाग बघायचा? तथाकथित शिवप्रेमी राज्यकर्त्यांना तर गडांच्या आणि इतिहासप्रेमींच्या व्यथा जाणून त्यावर तोडगा काढायला तर वेळच नाही) एक विस्मृतीत गेलेली बांधकाम पद्धती. अशी आव्हाने झेलत आज दुर्ग संवर्धन नावाचा खेळ सह्याद्रीच्या गडकोटावर खेळला जाताना दिसतो. आपण पुरातन भारतीय स्थापत्याच्या जवळ पास का पोहोचू शकत नाही, ही खंत मनाला अस्वस्थ करते.

unfinished leni...a series of chambers at the base of the rockportion

लेणी समूह

या परिसरात कातळाच्या पोटात दोन मोठी टाकी पाण्याने भरलेली दिसली. एक छोटासा उभ्या चढणीचा टप्पा पार केल्यावर आपण त्याच्या जवळ पोहोचतो. यातले एक टाके फारच विशाल आकाराचे अतिशय सफाईदारपणे आयाताकृतीत खोदलेले. त्याची रूंदी पन्नास फुटांपेक्षा जास्त असावी तर उंची २० फुट. दगड माती पडून हे विशाल टाकं वर पर्यंत बुजले गेले आहे. आतले पाणी स्वच्छ आहे पिण्या योग्य. दुसरं एक टाकंही बर्‍यापैकी मोठं सुबक चौकोनी थोडं पुढच्या बाजूला आहे. त्यातही दगड माती भरलेली. याच्या मागे कातळात काही खोल्याच्या रचना आहेत. त्यावर आता दगड पडून त्या उध्वस्त स्वरूपात असल्या तरी एका देखण्या बांधकामाची त्या साक्ष देतात. याचा वापर निवासासाठी, साधनेसाठी की आणखी कशासाठी', हा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. डाव्या बाजूला आणखी एक फार मोठी खोदलेली गुहा दिसली. या गुहेचा वापर अलिकडच्या काळात गुरे ठेवण्यासाठी केल्याचे संकेत दिसतात. याच्या तळाला भरपूर धुळमाती साठलेली दिसली. ही माता काळी नसून पांढरी आहे. त्याच्या पुढे आणखी एक चौकोनी खोदीव गुहांची रांग लागते. या गुहांचे मुख सुबक अशा मोठ्या चौकोनी आकारात खोदलेले. महाराष्ट्रातल्या लोकप्रिय लेणी समूहात जसा मुखाकडचा भाग हा विशाल चौकोनी रचनेतून कोरलेला असतो तशाच स्वरूपाचे हे देखणे कोरकाम. अर्थात आतमध्ये मुर्त्या किंवा कुठलेही चिन्ह खोदलेले नाही. हे कदाचित अपूर्ण राहिलेले काम असावे. तसे असेल तर गडाच्या आयुष्यातला तो धकाधकीचा काळ असू शकतो.

या भागातून साडे तीन रोडग्याचा डोंगर आणि त्याच्या मागचा चांदवडचा डोंगर. त्या पलिकडे मनमाड परिसरातले डोंगर न्याहाळता येतात. खाली विशाल खोरे हे दाट झाडीने नटलेले. त्याच्या मधल्या टप्प्यातून नदी किंवा झर्‍याच्या खुणा नाहीत, पण अलिकडच्या काळात बांधलेला एक बंधारा दृष्टीस पडतो. त्यात म्हशी मस्तपैकी डुंबत होत्या. तर गावातली मुलं चेंडू फळी खेळण्यात दंग. त्यांचा दंगामस्तीचा आवाज इथवर स्पष्टपणे ऐकू येत होता. म्हणजे खालच्या बाजूने हाकारे दिले तर गडावर व्यवस्थित ऐकू येत असणार. एखाद्या किलो मिटरवरून खालचे बोलणे वर पर्यंत ऐकू येत असणार!समोर दाट झाडीत एक पुरातन मंदिर. हे शेकडो हेक्टर पसरलेलं खोरं यातून थेट वडबारे गावाकडे जाणारी वाट. याच्या पुढच्या भागात नदी असू शकते किंवा आता ती राहिली नसावी. आमच्या सातमाळा डोंगरयात्रेच्या वेळी राजमार्ग उतरून हनूमानाच्या मुर्तीच्या बाजूने खाली उतरताना आम्हाला नदी सारखी आटललेल्या दगडगोट्यांची रचना दिसली होती. तेव्हाही त्यात वाहते किंवा साठलेले पाणी दिसले नव्हते. मग तिथे असे वाहून आल्या सारखे दगड कसे काय? हा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. आता आम्ही वरच्या बाजूला असल्याने तिथेही नदी किंवा वरून पडणारा धबधबा दृष्टीस पडला नाही. काय रहस्य असावे या आटलेल्या नदीचे. 

चोरवाट

चोरवाट

आता आम्ही राजमार्गाने वर न जाता चोरवाटेने वर जाण्याचा निर्णय घेतला. स्थानिक तरूणांचा एक गट वरून येत होता. त्यांना विचारलं की, वाट कशी आहे. यायला काही अडचण तर नाही ना. तर ते म्हणाले ही सुरक्षित नाही, तुम्ही राजमार्गाने वर या. आम्ही म्हणालो, आम्हाला याच वाटेने वर यायचे आहे, तेव्हा ते म्हणाला मग या! आमच्या पैकी दोघा दीपकांनी ही वाट बघितलेली होती. पण सुरूवातीला ती तीच असावी का? याचा त्यांना अंदाज आला नाही. दीपक घंगाळे हा मागिल भेटीत या वाटेच्या वरच्या मंदिरा पर्यंत आला होता. वर गेल्यावर त्यांना ती ओळखता आली. अतिशय सुंदररित्या कातळात घडवलेली चिर्‍यांच्या रचनेची ही वाट चोरवाट असू शकते याची मनोमन खात्री पटते. इंग्रजांनी राजदेरवर चढाई केल्यानंतर या परिसरातल्या किल्ल्यांचामोठ्या प्रमाणावर विध्वंस केला त्यात ही भली थोरली चोरवाट पुर्णपणे उधवस्त केली गेली असणार यात शंका नाही. आज भग्नदशेतही तिचे महत्व आणि सौंदर्यपूर्ण रचना खिळवून ठेवते.

बर्‍याच गडांच्या बाबतीत, चोरवाट हा शब्द ऐकिवात येतो यात 'चोरांसाठीची', असा अर्थ होत नाही तसा तो अभिप्रेतही नाही. गुप्त वाटांना चोरवाट म्हणण्याचा प्रघात होता. हे सामान्यांच्या नजरेपासून लपवून ठेवलेले गडावरचे निष्काशन मार्ग. आणिबाणीच्या प्रसंगी या वाटांचा उपयोग गडातून बाहेर पडण्यासाठी केला जात असे. हे मार्ग वापरले जात नसत, एखादा बोगदा, भूयारातून हे मार्ग काढलेले असत काही ठिकाणी निम्मी अधिक वाट दिसायची व नंतर ती गायब व्हायची. म्हणजे ती दिसणार नाही, कोणाच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने ती लपवली जायची. दरवाजा असेल तर तो माती भरून बंद करून ठेवला जायचा. गरजेच्या प्रसंगी ही माती उकरून त्यातून गडावरचे महत्वाचे व्यक्ती किंवा सैन्या तुकड्या त्याचा वापर करत. 

रामसेजच्या चोरवाटेचा इंग्रजांनी तयार केलेल्या राजपत्रात उल्लेक आढळतो. रायगडावरचा वाघ दरवाजा याचे उत्तम उदाहरण, या वाटेने राजाराम महाराजांनी प्रमुख सरदार मंडळींसह गड सोडल्याची वदंता आहे. इंद्राईची चोरवाट दूरवरून राजरोसपणे दिसते, तर ती चोरवाट असू शकते का? अशी शंका अनेकजण विचारत आहेत. त्यात तथ्य असू शकेल. परंतू हे नाव प्रचलित आहे. ते चुकीने झाले असावे किंवा चोरवाटेचा वापर बंद केलेला असावा व आणिबाणीच्या प्रसंगी तिच्या वापराचे नियोजन असावे. साठपाटीची वाट बघितल्यावर तिथून वरच्या मागात जाण्यासाठी सोयीचा मागच नाही. अवघड अशी आडवी वाट पकडूनच गडावर जाता किंवा गडावरून उतरता येऊ शकते. कदाचित साठपाटीचा संबध आणिबाणीच्या प्रसंगातला निष्काशन मार्ग असू शकतो. 

चोर वाटेवर खालच्या बाजूला दोन ठिकाणी दरवाजाची रचना आहे. मातीने हे दरवाजे चिनून ती बंद करत असावेत. चोरवाटा अशाच बंद करून ठेवल्या जातात व आणिबाणीच्या प्रसंगी माती उकरून गडावरची मंडळी किंवा सैन्य तुकड्या यातून बाहेर पडतात. या वाटेची बरीच पडझड झाली आहे. ती कोणी बांधली? कधी बांधली? केवढ्या घडामोडी तिने पाहिल्या? या सगळ्या गोष्टी काळ नावाच्या ग्रंथात कुलुपबंद झाल्या आहेत. संवर्धन व संशोधना अभावी हा मौल्यवान ठेवा आता निसर्गात मिसळून चालला आहे.  

घड्याळात दुपारचे ३-११ वाजले होते. यावाटेने वर गेल्यानंतर पलिकडून खालच्या बाजूला उतरणारी एखादी वाट असू शकते का? हे जाणने महत्वाचे होते. कारण डुक्कर घळीतून उतरण्यासाठी ते गरजेचे होते. त्याचे उत्तर कोणाकडेच नसल्याने आलोच आहोत तर माथ्यावरचा देखणा लेणी समूह बघू, वरच्या पुरातन शिवमंदिराला भेट देऊन परतीचा मार्ग धरू, असा निर्णय आम्ही घेतला. आमच्या समोर आणखी एक अडचण होती, ती म्हणजे पायरी मार्ग उतरून गेल्यानंतर आव्हानात्मक आडवी वाट पार करायची. जोराचा पाऊस झाला तर साठपाटी उतरणे अवघड ठरले असते. तिथे पोहोचल्यावर पाऊस झाला तर ती उतरण्यावाचून गत्यंतर नव्हते. मग आम्ही राजमार्ग उतरून वडबारे गावात उतरण्याचा निर्णय घेतला. तिथून एखाद्या वाहनाने मतेवाडीत येणे म्हणजे फार मोठी कसरत ठरणार होती. शिवाय आजची भटकंती खाशी थकवणारी होती. 

वर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळला. डोंगर ओळखून घेतले. आज कोळधेर, धोडप आदी थेट अचला किल्ल्या पर्यंतचा परिसर ओळखता येत होता. सातमाळा रांगेतले अनेक डोंगर एकामागे एक अशा स्वरूपात इथून दृष्टीस पडतात. कोणत्याही ऋतूत हे दृष्य पाहत रहावे असे. आज तर ते हिरवेगच्च, स्वच्छ ढगांच्या निळ्या आकाशाने मढलेले. मावळीमुळे पलिकडून येणार्‍या किरणात त्यांचे सौंदर्य वेगळे खुलत होते. वाटेत एक स्थानिक कुटुंब परतताना दिसले तर गुराख्यांचा लहान कबिला पाणी भरून मोठ्या वाहण्यासाठी आलेला. इथून पाचच मिनीटात माथ्यावरचे सर्वात मंतरलेले ठिकाण लागते ते म्हणजे विस्तीर्ण आकाराचा तलाव आणि त्याच्या मागे कातळात खोतलेलले चार खांबांचे शिवमंदिर. जुन्या काळातले ज्ञात असे हे बांधकाम. स्तंभ नक्षीत कोरलेले. तर बाजूच्या भिंतींतही अर्धस्तंभाकार कोरलेले. गाभार्‍यात शिवपिंड तर शेजारच्या लहान कोनाड्यात शीर नसलेली देवीची भग्न मुर्ती. यामुर्तीला भरपूर शेदूर लावल्याने कोणत्या देवीची असावी याचा बोध होणे कठिण. ही पार्वतीची असावी असे वाटले. आणखी काही मुर्त्यांचे अवशेष भग्न स्वरपात विखुरलेले. दीर्घकाळ मुसलमान आक्रमकांच्या ताब्यात हा किल्ला होता, तेव्हा देवी देवतांच्या मुर्त्यांचा विध्वंस करण्यात आलेला दिसतो. येथे फार वेळ रेंगाळता येणार नव्हते. मावळती आम्हाला परतण्याचा इशारा देत होती आणि दिवसभर बर्‍यापैकी दम धरलेला पाऊस.

परतताने वाटेत वाड्यांची सुबक जोती आणि उत्तमरित्या आयातात कोरलेले चिरे दृष्टीस पडत होते. वैभवाच्या काळात काय देखण्या वास्तू याकिल्ल्यावर असतील? अशा भूतकाळात आपण सहजच मागे निघून जातो. आम्ही यावेळही सर्वोच्च माथा गाठू शकणार नव्हतो. पूर्व कड्यात आठ इंच व्यासाची सरळ रांगेत खोदलेली खोबण्यांची भलीमोठी रांग दिसली. अशा प्रकारे या खोबण्या कशासाठी खोदल्या असतील. हा दगड काढण्याचा प्रकार तर नव्हे किंवा मग लाकडी ओंडके रोवण्यासाठी केलेली भिंतीची सोय. 

अंचला अहिवंत पर्यंत सातमाळेचे दर्शन...

गडांची जबाबदारी कोणाची?

आता आम्ही राजमार्गाला लागलो. वरच्या भागातून सटाणा, मालेगाव, चांदवड व येवला ही गावे ओळखता आली. अलिवर्दी खानाच्या शिलालेखाच्या खालच्या पार्‍यांवर फारसा दगड गोटा पडलेला जाणवला नाही. दीपकने माहिती दिली, काही वर्षांपूर्वी तो इथे आला तेव्हा या पायर्‍या सलग होत्या. नंतर गुरे वर नेण्यासाठी त्या मधोमध फोडल्या असाव्यात. आम्हाला माथ्यावर खरोखरच म्हशी व गाईंचा कळप दिसला. 

या किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणीच घेत नाही. हे किल्ले वनखात्याच्या हद्दीत आहेत. परंतू ते पुरातत्वीय अवशेषांची, पायर्‍या, बुरूजांची त्यातल्या मुर्त्यांची जबाबदारी घेत नाहीत. ते काम पुरातत्व विभागाचे असे म्हणतात. पुरातत्व विभागाची कोणतीही अशी योजना नाही, जी गडांवरच्या विखुरलेल्या अवशेषांची, तट, भिंतींची, पायर्‍यांची, मंदिरांची किंवा मुर्त्यांचे संरक्षण करू शकेल. इतकेच काय, त्यांच्याकडे या सर्व वास्तूंची सविस्तर नोंद नाही. रोजचे सोडू या, पण अधून मधून त्यांची पाहणी करूत राहण्याची योजना नाही. ज्याला वाटेल तो गडाच्या वास्तूंना हवं ते करू शकतं, अशी ही दुर्लक्षित व्यवस्था. पायथ्याच्या वाड्या वस्त्या, ग्रामपंचायतींवर सुद्धा जबाबदारी टाकली जात नाहीत, कारण त्यांच्या हद्दी डोंगरावर येत नाहीत. गावातून कोणी असा विध्वंस केला तर त्यांची नोंद ठेवण्याची व ती माहिती पुरातत्व विभागाला कळविण्याची काही तरी व्यवस्था असायला हवी. इथक्या देखण्या पायर्‍या मधल्या बाजूने फोडून काढल्या असतील तर हा अतिशय गंभीर प्रकार आहे. भारताच्या इतिहासाचे एक न भरून निघणारे नुकसान. 

राजमार्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवत आम्ही ४-५७ वाजता शेवटच्या पायरीवर दाखल झालो. आता एकच आव्हान होते, ते म्हणजा पावसाचे. आम्ही वेळेत उतरू शकणार होतो, त्यामुळे वडबार्‍यात न जाता आम्हाला आमच्या गाडया उभ्या केल्या त्या मतेवाडीत उतरता येणार होते. उन लागल्याने जी आडवी वाट पार करायला आम्हाला दिड तास लागला होता ती आता आम्ही अवघ्या ४० मिनीटात पार केली. साठपाटीवर पुन्हा सुरक्षेसाठी दोर लावला आणि साठपाटी ६-०४ वाजता पार झाली. याच्या पुढचा टप्पा सकाळी कसा चढलो काहीच आठवत नव्हते उतरताना जाणवलं ती केवढी मोठी चाल होती ती. मळलेल्या पाउलवाटा तीन ठिकाणी हरवल्या. गायवाटा, घसारे, शेवळलेल्या ओहळी पार करता करता नाकी नऊ आले. थकवा मात्र पुर्णपणे गेला होता. चालण्याचा वेग जोराचा होता. सपाटीला आल्यानंतरही आम्हाला आमच्या गाड्यांपर्यंत दिड किलो मिटर अंतर चालावे लागले. तिथे मात्र अंधार पडला. ढगे आजोबांनी नाही म्हणत असतानाही फार आग्रह करून त्यांच्या शेतातल्या नारंगी लिंबाचा चहा पाजला. काळोखातही निळ्या रंगछटेत डुक्कर घळ खुणावत होती, ''ही वाट केव्हा''?

।।जय हो।।


ही दरड अलिकडे कोसळलेली...त्यामुळे दिसून येणारे इंद्राईवरचे बारिकसे नेढे 

खजिना झाकावा तसे डोंगर झाकण्यासाठी ढगांची दाटी...डेहेणेवाडीतून!

clear visibility with passing white clouds

साठपाटीच्या वाटेवर हरळीतच पक्षाने केलेले घरटे


शेवाळलेल्या पायर्‍यांवर सुरक्षेसाठी दोर

समोर दिसतोय तो चांदवडचा किल्ला आणि नितांत देखणा रासलिंग महादेवाचा डोंगर

हातावर गुपचूप येऊन बसलेले फुलपाखरू

the ridge that leads towards the sade teen rodge mountain

its sheer luck to get facing light to get the silhouette

वर च्या कातळात दोन पायरी मार्ग

राजमार्गा पर्यंत १.६७ किलो मिटरची आडवी वाट


ना समोरचे काही दिसते ना पायाखालचे...

ही आडवी वाट म्हणजे एक दिव्यच नितांत सुंदर तरी आव्हानात्मक



साठपाटीच्या वाटेने जोडणारी इंद्राइ डोंगरधार...


हिरवी निळी पांढरी रंगसंगती आणि प्रकाशाची प्रसन्न उधळण


मधूनच समोरचा प्रकाश येऊ तृणपाती उजळून देई


ढगांचे आवरण यांना झाकून देई मग थोड्या प्रकाशाने रान उजळून देई



साडेतीन रोडगे इंद्राई मधल्या भागातले खुरटे वन मध्ये साठवण बंधारा


हे जाड पातेदार गवत अंगाला स्पर्ष करून पवित्र करत होते


पुरूषभर उंचीचा झाडोरा फोटो पूरता थोडा कमी झालेला...



चोरवाटेवर लांबूनच दिसणार्या दोन मध्यम द्वार चौकटी


चोरवाटेच्या खालच्याच भागातले भव्य सुबक टाके...


केवळ छन्नी हाथोड्याच्या सहाय्याने केलेले मोठे आणि अचूक तासकाम

ही बर्यापैकी मोठी खोदून काढलेली गुहा सद्या गुरांचा आश्रय बनलेली


चोरवाटे समोरच्या खडकावर दिसणार्या या खुणांचे प्रयोजन काय असावे?


प्रकाशाचा खेळ न्यारा...समोरून येतो बदले नजरा...


कोसळलेल्या पायरी मार्गातून दिसणारा वडबारे गावच्या मागील बाजुचा परिसर


महिष एवं गोधनाचा मुक्त संचार...मुक्त विहार



इंद्राईचे शिवमंदिर

इंद्राई शिवमंदिरा समोर कातळात खोदलेला भव्य तलाव


इंद्राईवर पुर्णत: कातळ खोदून तयार केलेले सुंदर नक्षीदार शिवमंदिर


शिवमंदिराचा परिसर स्वच्छ ठेवण्याची नितांत आवश्यकता


शिवमंदिरात साठणारे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी केलेली निष्कासन व्यवस्था



गोल छिद्यांची रांग


अलिवर्दी खानाचा शिलालेख परिसराती जिंकलेल्या किल्ल्यांचा नोमोल्लेख


या पायर्‍या मधून फोडल्यात म्हणे...तसे असेल तर हे प्रकार थांबावे कसे?


इतकी मोठी विष्टा बिबट्याची तर नक्कीच नाही?


सातमाळेच्या डोंगरांना कधी मुकुट तर कधी पूर्णाच्छादन...